Sunday, November 10, 2013

शिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर



 

मुंबईला जाणे झाले. रेल्वेने जाताना अंबरनाथ नावाचे स्टेशन लागते. या ठिकाणी शंकराचे प्राचीन मंदिर आहे. येताना जवळच असलेले अंबरनाथचे सुप्रसिद्ध मंदिर त्या विषयी.....



मध्य रेल्वेच्या मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ हे रेल्वेस्टेशन म्हणून ओळखलं जातं. या व्यतिरिक्त ‘‘.......... येथे काडेपेट्यांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करण्याचे कारखाने आहेत.’’ असे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नाचे उत्तर लहानपणी ....अंबरनाथ.... असे प्रत्येकालाच आठवत असेल.  औद्योगिकीकरणात झपाट्याने बदलत्या या शहराला प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे ते येथील प्रख्यात अंबरनाथ शिवमंदिरामुळे.

              संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने  जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ हे एक प्राचीन मंदिर. युनेस्कोने १९९९ साली या मंदिराला दर्जा दिला. हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार छित्तराज (इ.स. १०२०-१०३५) याने बांधण्यास प्रारंभ केला व त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी बांधकाम पूर्ण झाले. मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली.  शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली. अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर केवळ पाहण्यासारखे आहे. मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर म्हणतात. याच नावावरून गावाचे नावे अंबरनाथ  पडले असावे.




भूमिज पद्धतीचे बांधकाम :

महाराष्ट्रात शंकराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे गड किल्ल्यांवर उभारली गेली आहेत. तर काही जमिनीवरही बांधली गेली. औरंगाबादजवळील घृष्णेश्वर मंदिर, भीमाशंकर येथील मंदिर, पुण्याजवळील भुलेश्वर ही त्यापैकीच एक. अंबरनाथ मंदिराची निर्मिती ही एका विशिष्ट शैलीत केली गेली आहे. भूमिज पद्धतीत बांधलेले हे शिवमंदिर जुने मंदिर आहे. शिल्पशास्त्राप्रमाणे हे शिवमंदिर सप्तांग भूमीज पद्धतीत तयार केले आहे. मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. पूर्वी एकावर एक असे सात भूमी (शिल्परांगा) रचण्यात आल्या होत्या. मात्र गाभाºयावरील कळस नष्ट झाल्याने तीनच भूमी (शिल्परांगा) शिल्लक आहेत. सध्या मंदिराचा कळस अस्तित्वात नाही.

मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारे मंदिराला आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये असे बांधकाम पाहण्यास मिळते. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराची आठवण या ठिकाणी नक्कीच येते. हे मंदिर उभारताना गणिताचा विशेषत: भूमितीचा वास्तुशास्त्रात विचार केला गेल्याचे सहज लक्षात येते. केवळ दर्शनासाठी न जाता येथील स्थापत्यशास्त्राचा थोडा अभ्यास केल्यास हे सहज लक्षात येते.





देवदेवतांच्या शिल्पांचे मंदिर :

 मंदिराबाहेरील शिल्पे अनेक हिंदु देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरुडासन विष्णू, शिव, विवाहापूवीर्ची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरा वध मूर्ती, पार्वती चामुंडा, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, नटराज, कालीमाता, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती, महिषासुर र्मदिनी या मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहे. विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे, आभूषणे आणि वेशभूषाही साकारलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. हे बहुधा शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते. मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता एकाच मूर्तीत शिल्पकाराने साकारलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर शिल्पकारांनी साकारलेल्या अनेक भव्य मूर्ती पाहून क्षणभर त्या आपल्याकडे पाहत असल्याचा भासही होतो. गेली ९०० वर्षे या मूर्ती आपले मौन सांभाळून आहेत. पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पे असी शिल्पकृती येथे आपणास पहावयास मिळते. मंदिराच्या बाहेर व आतमध्ये देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर सुंदर वाटते.







महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमांडपंती शैलीची मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच 'भूमीज' स्थापत्य शैली असेही म्हणतात. सर्वच पुरातन मंदिरांना 'हेमांडपंती' शैलीची मंदिरे म्हणण्याच्या सवयच लोकांना लागून राहिलेली आहे. जुने मंदिर दिसले की हेमांडपंती मंदिर असल्याचे छातीठोकपणे लोकं सांगतात. देवगिरीच्या यादवांच्या काळातील वास्तुविशारद हेमाद्री पंडित अथवा हेमांडपंत यांनी मंदिर बांधण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली होती. त्या पद्धतीला हेमांडपंती शैली म्हणतात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. अंबरनाथचे हे मंदिर हेमांडपंती पद्धतीने बांधलेले असून कोकणात आढणाºया काळ्या दगडाला आकार देऊन ते कोरलेले आह़े

मंदिरासमोर प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत. मंदिरातील सभामंडपात चार खांब दिसून येतात. सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वतुर्ळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. सभामंडपापासून दहा बारा पायºया खाली उतरल्यावर गाभारा दिसतो. गाभाºयात स्वयंभू शिवलिंग आह़े   गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असून खाली उतरायला पायºया आहेत.
काळाच्या ओघात म्हणा किंवा परकीय आक्रमणांमुळे म्हणा मंदिराच्या अनेक मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. ऊन, वारा आणि पावसाने या मूर्ती झिजल्या आहेत. पण तरी सुद्धा ज्या मूर्ती वाचल्या आहेत ते शिल्पकलेचे अद्भूत दृश्य पाहून मन सुखावते. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही या मंदिराच्या वैभवाची साक्ष देत आहेत.  मंदिरात श्रावणात मोठी गर्दी असते. राज्यातील विविध भागांतून दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा येथे लागतात. येथील जत्रा तीन दिवस सुरू असते.
अजंठा वेरूळला जाणारे अनेक पर्यटक आहेत. मात्र, या प्राचीन मंदिराला भेट देऊन खरोखरच शिल्पकला प्राचीन काळी किती मोठी होती हे समजते.



प्रशासनाचे दुर्लक्ष :

सध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या खात्यातंर्गत आहे. उल्हासनगर  पालिकेच्या जवळच असलेल्या या मंदिराचा आजुबाजूचा परिसर अजूनही विकसित झालेला नाही.  वालधुनी  ऊर्फ वढवाण नदीच्या ओढ्याच्या काठावर हे मंदिर आहे. सध्या या ओढ्याची सांडपाणी वाहून नेणारा मोठा ओढा म्हणून ओळख सांगितली जाते.
वाढलेल्या प्रदूषणाचा फटका या मंदिराला बसू नये म्हणजे झालं. त्यामुळे हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. सध्या मंदिराला चारही बाजूने संरक्षक जाळी उभारली गेल्याने बाहेरील भटकी जनावरे आदींपासून संरक्षण नक्कीच मिळाले आहे. मात्र, शेजारून वाहणारी मोठ्या आकारातील गटारे पाहून मन दु:खी होते. या गटारात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा, व अन्य कचरा तसाच पडलेला दिसून आला. कल्याणपासून अंबरनाथपर्यंतचा रस्ता अतिशय छोटा असल्याने वाहतूककोंडी रस्त्यावर जाणवली. वाटेत मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी कोणतेही मार्गदर्शक फलक दिसून आले नाही. तेव्हा वाटेत थांबून अनेकांना विचारून रस्ता शोधावा लागला.



कसे जावे :

  • मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना अंबरनाथ हे तिसरे स्थानक आहे. येथे हे मंदिर आहे. रेल्वे स्थानकापासून अंदाजे दोन किलोमीटरवर हे मंदिर आहे.
  • मुंबई दादर स्टेशनपासून अंदाजे ५२ किमी. वर आहे. रेल्वेने गेल्यास १ तासाचे अंतर आहे.
  • पिंपरी-चिंचवडमधून अंदाजे १३५ किलोमीटरवर अंबरनाथ आहे. कळंबोली व शिळफाट्यामार्गे जाता येते. येथील कळंबोली फाट्यावरून जाताना असंख्य गतिरोधक असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

Sunday, November 3, 2013

कात टाकून उभा राहतोय : विश्रामबागवाडा

पुण्याने आपल्या वाढत्या आधुनिकतेबरोबर आपले पुरातनपण वास्तू रूपात जपले आहे. शनिवारवाडा, पर्वती, महादजी शिंदेंची छत्री, विश्रामबागवाडा या त्यापैकीच एक वास्तू. पेशवेकाळात पुण्यात अनेक वाडे बांधले गेले. त्यापैकी अनेक काळाच्या पडद्याआड गेले. खुद्द दुसºया बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या राहण्यासाठी व आरामासाठी बांधलेला ‘विश्रामबागवाडा’ सध्या दुरुस्ती व डागडुजीकरणामुळे त्याच्या मूळ रुपात येत आहे. त्या विषयी....



दुसरा बाजीरावांविषयी (थोडक्यात)

दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला.  रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा बाजीराव हा मुलगा. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळव्यातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथे १० जानेवारी १७७५ ला बाजीराव यांचा जन्म झाला. दुसरा बाजीराव म्हणून ते ओळखले जाऊ लागले. वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढले. १७९६ ला पेशवेपद व पेशवे पदासाठी झालेले राजकारण, पेशवेपद मिळणं दरम्यानच्या काळात मराठी सत्तेची अवकळा, ब्रिटिशांकडून ३ जून १८१८ ला धुळकोट येथे शरणागती व त्यानंतरची कानपूरजवळील ब्रह्मावर्तास रवानगी. १८७० रोजी मृत्यू असा बराच मोठा इतिहास या दुसºया बाजीरावांच्या कारकिर्दीत घडला.
दुसºया बाजीरावांविषयी पुढे वेगळा लेख लवकरच...

विश्रामबाग वाड्याविषयी :

पुण्यातील भरवस्तीत असणारा हा विश्रामबाग वाडा. त्यांच्या अनेक कथांनी प्रसिद्ध आहे. दुसरा बाजीरावांचा हे विश्रामगृह. सध्या येथे ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ हा प्रवास विविध चित्रांच्या माध्यमाने पहावयास मिळतो. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक वास्तू, त्यांच्या खुणा सांगण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. ‘पुनवडी ते पुण्यनगरी' या प्रदर्शनात पुण्याचा पुनवडीपासून १७७२ पर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यानंतर १८५५ पर्यंतचा इतिहास, माहिती चित्रे, नकाशे, छायाचित्रे यांच्या साहाय्याने मांडण्यात आला आहे. शनिवारवाडयाचा जुना नकाशा, पहिले बाजीरावा, नानासाहेब पेशव्यांनी वसविलेल्या पुण्यातील पेठा, बंदीस्त नळयोजजेसाठी कात्रजवरून आणलेला पाणीपुरवठा, पुण्यातील विविध देवस्थाने, घाट, त्यांचे भौगोलिक स्थान, निर्मितीची प्रक्रिया यांची माहितीही छान व विस्तृत दिली आहे. आहे. वाड्यातील ही सर्व माहिती बघून मन इतिहासकाळात जाते. 





वाड्याचे बांधकाम :

दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला. वाडा बांधण्यासाठी ६ वर्ष गेली. २६ मार्च १८०३ रोजी वाड्याच्या बांधकामाला सुरूवात झाली. २० नोव्हेंबर  १८०८ रोजी वाड्याची वास्तूशांत झाली.  ३९ हजार चौरस फुटांची ही वास्तू आहे. वाड्याची मूळ जागा पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांची. या जागेवर प्रथम बाग होती. शनिवारवाड्यापासून काहीच अंतरावर मोकळ्या जागेत असलेल्या या जागेमुळे ही जागा विकत घेऊन त्यावर सध्याचा वाडा बाजीरावांनी बांधला. १६ फेब्रुवारी १७९७ रोजी बाजीरावांचे सासरे सरदार दाजीबा ऊर्फ हरिपंत फडके यांनी मुलगी राधाबाई हीच्या लग्नात हुंड्याच्या स्वरुपात ही जागा दिली गेली असेही वाचण्यात आले.  वाडा बांधण्यापूर्वी येथे सुंदर अशी बाग होती. बागेची निगा राखणाºया माळ्याचे नाव विश्राम असे होते. तसेच आराम करण्यासाठी ही जागा बांधल्याने याला ‘विश्रामबाग’ वाडा असे म्हणण्यात येऊ लागले. 
            वाड्याचे बांधकाम हे विटांचे आहे.  दुसºया मजल्यावर नृत्यदरबार आहे.  या ठिकाणी पिवळ्या रंगातील मोठे पडदे असून, त्याकाळातील व्यवस्था कशी असेल याचे सादरीकरण केलेले आहे. हॉलच्या मुख्य जागी गादी व शेजारी दोन लोड ठेवण्यात आलेले आहेत. वरती गणपतीची मूर्ती आहे. पडद्यांच्या शेजारील खांबांवर, छतावर बारीक सुंदर नक्षीकाम केलेले आहे.  लाकडी महिरपीतून साकारलेले सुंदर कोरीव खांब असून छतावर नक्षीदार आकृत्या कोरलेल्या आहेत. चौकात लाकडी मोर व वेलबुट्टीच्या नक्षीकामामुळे सुंदरता प्राप्त झाली आहे. संपूर्ण वाड्यात सुरू व सागाच्या लाकडांचा वापर केलेला आहे. वाई येथील नाना फडणवीसांच्या मेणवली  वाड्यात सुद्धा असेच बांधकाम आहे. विश्रामबागवाड्याचे बांधकाम जुने झाले असल्याने वाड्यातील मेघडांबरीत (बाल्कनीमध्ये) पर्यटकांना सध्यास प्रवेश बंद केलेला आहे.  तीन चौक असणारा हा प्रशस्त वाडा असून चारही बाजूंनी मोकळा असा मोठा चौक येथे आहे. वाड्यात अतिथ्यगृह, विश्रामस्थान, भोजनगृह, खलबतखाने अशी विविध दालने आहेत. चौकामुळे सर्व दालनात हवा व उजेड भरपूर प्रमाणात मिळतो. १३ मे १८७९ ला वाड्यात आग लागली. या आगीत पुढील चौकाभोवतीचा इमारतीचा भाग जळाला. मागचा भाग मात्र तेवढा वाचला. त्यावेळच्या बांधकामाशी मिळता जुळता अशा स्वरुपाचा वाडा इंग्रजांनी पुढे बांधला. त्यामुळे या वाड्याला पेशवे व इंग्रज धाटणीच्या बांधकामाचे स्वरुप दिसून येते. सजावटीसाठी लाकडी खांब, तुळ्या, पटई यावर कोरीव काम केलेले आहे. आतील बांधकाम हे लाकडामधील कोरीव काम असल्याने एक प्रकारची भव्यता वास्तूला प्राप्त होते. वाड्यात असलेले काचेच्या हंड्यांमुळे वाड्याची शोभा आणखीनच वाढली आहे. वाडा सजवताना पक्ष्यांच्या आकृत्यांचा वापर केलेला आहे. तेल लावून हे लाकडीकाम चकचकीत करण्यात येत असे. वाड्यात कात्रजच्या तलावातून भूमिगत नळातून पाणी आणून चौकातून कारंजी उडवीत असत. वाड्यात एक छोटी विहिर सुद्धा आहे. सध्या ती बंद केलेली आहे.  
              ब्रिटिशांनी अटक करेस्तोवर बाजीराव ११ वर्ष याच वाड्यात राहत होते. त्यानंतर बिठूरला बाजीरावांची उचलबांगडी होईपर्यंत त्यांची पत्नी वाराणशीबाई राहत होत्या. १८२१ मध्ये वाड्यात वेद व संस्कृत शिकविण्याची शाळा सुरू करण्यात आली.  १६ नोव्हेंबर १८५२ रोजी येथील दिवाणखान्यात महात्मा जोतिबा फुले यांचा इंग्रज सरकारतर्फे मेजर कॅडी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
                दुसºया बाजीराव पेशव्यांनंतर ब्रिटीश सत्तेच्या उदयानंतर प्रथम वाडा जेल म्हणून उपयोगात आणला गेला. त्यानंतर १९३० ते १९५८ दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात होता. सध्या वाड्याच्या तळमजल्यावरील बहुतांश मोठा भाग हा पोस्ट आॅफीससाठी उपयोगात आणला जात आहे. शासकीय ग्रंथालय सुद्धा येथे आहे. तर दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूची जागा वापरण्यासाठी देण्यात आली आहे. यात भारतीय हस्तकला, कपड्यांवरील भरतकाम आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे उपहारगृह आहे.
        दुसºया बाजीरावाने शनिवारवाड्यात नारायणरावाचे भूत वावरते या सबबीखाली बुधवार, शुक्रवार व विश्रामबागवाडा हे वाडे बांधले. कोथरूड, पाषाण येथेही वाडे बांधले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी गड किल्यांना महत्त्व दिले. पुढे १८ व्या शतकानंतर या गडकिल्यांऐवजी जमिनीवर मोठमोठे आलिशान असे वाडे बांधण्याकडे लक्ष दिले जाऊ लागले. बहुधा महाराजांच्या काळात धामधुमीमुळे असले वाडे बांधणे संरक्षण दृष्ट्या शक्य नव्हते. पुढे किल्यांची गरज कमी भासू लागल्याने वाडे बांधण्यात येऊ लागले. श्रीमंत व्यापारी, सावकार, सरदार यांनी १८ व्या शतकात आपआपले मोठे वाडे बांधले.

वाड्याच्या आतील विस्तृण चौक व शोभीवंत कारंजे.

महादजी शिंदे यांचे वानवडी येथील छत्रीची प्रतिकृती.


तुळशीबाग मंदिराची प्रतिकृती.




हुबेहुब प्रतिकृती :

          वाड्याच्या मागील बाजूस पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या वस्तूंच्या छोट्या प्रतिकृती तयार करून त्या काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या विषयी थोडक्यात माहितीही येथे देण्यात आलेली आहे.  पुण्यातील प्रसिद्ध गोखले हॉल, कसबा गणपती, मंडईची जुनी इमारत. फर्ग्युसन कॉलेज, ससून हॉस्पिटल, महादजी शिंदे यांची छत्री, पेशवे दफ्तर अशा वास्तूंचे  छोटे छोटे दरवाजे, खिडक्या व इतर बारीकसारीक गोष्टी या प्रतिकृतींमधून तयार केलेल्या आहेत.
       ऐतिहासिक वारसा असलेल्या या वाड्याचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. हा वाडा पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार हे निश्चित. वाडा पुण्यातील सगळ्यात जास्त रहदारी असलेल्या बाजीराव रस्ता व लक्ष्मी रस्त्यावर आहे. पुण्याच्या कुमठेकर, रस्त्यावर, सदाशिव पेठेत हा वाडा आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. वाड्याच्या समोरच्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे. पुण्यातील प्रसिद्ध मिठाईवाले चितळेबंधू,  महिलांचे दागदागिने, कपडे यासाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग आहे.  त्यामुळे विश्रामबाग परिसरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. अनेकजण तुळशीबाग, मंडई व विविध कपड्यांची दुकाने यांच्याकडे आवर्जून जातात. परंतु या वाड्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. दुपारच्या वेळी वाड्याच्या ओसरीत ताणून देणारे महाभाग ही येथे आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. पुणे शहराचा इतिहास समजण्यासाठी एकदा आवश्य येथे भेटी द्यावी.

मंडईची प्रतिकृती.











खांबावरील व छतावरील नक्षीकाम


खांबावरील व छतावरील नक्षीकाम






वाड्यातील नृत्यदरबार.




तुळशीबाग परिसर.

Add caption

तुळशीबाग परिसर.


नानासाहेब पेशव्यांनी कात्रजच्या तलावावरून पुणे शहरापर्यंत बंदीस्त पाणीपुरवठा केला होता. त्यांच्या विषयी विश्रांतवाड्यात दोन माहितीपत्रक दिलेले आहेत.






वाहतूककोंडी नित्याचीच :

पुणे शहराच्या मध्यभागी आणि एक महत्त्वाचा रस्ता म्हणून बाजीराव रस्त्याची ओळख आहे. जवळच असलेली तुळशीबाग, मंडई यामुळे हा परिसर नेहमीच खरेदी करणाऱ्यांनी गजबजलेला असतो. त्यातच अरुंद रस्ते व फुटपाथची कमी जागा, या जागेवरच पथारीवाल्यांनी उदरनिर्वाहासाठी मांडलेला त्यांचा व्यवसाय, खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे या भागात नेहमीच वाहतूककोंडी असते. मोकळा श्वास घ्यायला येथे मोठी मारामारी करावी लागते.

तिकीट दर :

चित्र व प्रतिकृतींच्या माध्यमातून पुण्याचा इतिहास सांगणारा ‘पुणवडी ते पुण्यनगरी’ हा विश्रामबागवाडयातील एक छोटे दालन आहे.
पुणवडी ते पुण्यनगरी पाहण्यासाठी माणसी ३ रुपये असे तिकीट दर् आहे. तिकीट आठवणीने घेणे.

कसे जाल :

पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेटवरून रिक्षा, बसेस या भागात येतात. पुणे स्टेशनपासून अंदाजे ४.५ ते ५ किलोमीटर आहे.

हा लेख आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे प्रतिक्रिया लिहा.

कॉपी करू नका