Wednesday, November 28, 2012

लवासा

‘लवासा’ची गरज? मौजमजेसाठी



          सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर तर येथे देशी - विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. या पर्यटनगरीला अजून आकर्षण निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पर्यटकांसाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे पर्यटनासाठी खुली करून देण्याचा  जोरदार प्रयत्न सुरू आहे. पूर्वी खडकवासल्याच्या व मुंबईच्या चौपाटीवर जाऊन भेळ खाल्याची चैन आठवते. आता ही चैन आधुनिक जगात अजून वाढली आहे. श्रीमंतांसाठी या गावातल्या दरीत ‘स्कूबा डायव्हिंग’ ‘रिव्हर राफ्टिंग’ करणं आदी गोष्टी म्हणजे चैन मानलं जावू लागले आहे.
          ‘लवासा’ हे प्रकरण रोजच प्रसारमाध्यमांतून गाजतयं. रोज त्यावर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. लवासा प्रकल्पाला सुरूवात झाल्यापासून त्याची प्रसिद्धी केली जात आहे.  पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या क्षेत्रात हा प्रकल्प उभा रहात आहे. वरसगावच्या धरणाच्या बाजूची १८ गावे  वेल्हा, मावळ,  मुळशी या तीन तालुक्यांतर्गत येतात. त्यांचा पर्यटनासाठी विकास सध्या सुरू आहे. पुण्यातून चांदणी चौकातून पिरंगुटच्या पुढे गेले की लवासाकडे जाण्यारे मोठे फलक आपले लक्ष वेधून घेतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अवाढव्य प्रकल्प उभारत असताना स्थानिक रहिवाशांना कितपत विश्वासात घेतले आहे. हा प्रश्न  पडतो. येथील वातावरण पर्यटन स्थळाला पोषक आहे. पर्यटन स्थळाच्या नावाखाली निसर्गाला धक्का लावून, कायद्याला धाब्यावर बसवून हा प्रकल्प सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यांतून येऊ लागल्या आहेत.
          लवासा हे शहर सरकारच्या विशेष निर्माण अधिकार वापरून म्हणजेच ‘स्पेशल प्लानिंग आॅथॉरीटी’ अतंर्गत तयार होत आहे.  जागतिक ख्यातीची डिझाइनिंग कन्सल्टंट असलेल्या ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ या कंपनीने या संपूर्ण प्रकल्पाची आखणी केली आहे. यात लवासामध्ये तीन मोठी महानगरेच वसवण्यात येत आहेत. यातल्या पहिल्या नगराचं नाव आहे दासवे. भोईनी, मुगाव,  कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, पडलघर, वदवली, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे ब्रदुक, साईव, भोडे, वरसगाव या गावांमध्ये संपूर्ण लवासा सिटी २०२१ पर्यंत उभी राहील, अशी अपेक्षा आहे. नावातच लवासा ‘सिटी’ आल्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे अत्याधुनिक शहर उभे राहणार हे निश्चित आहे. अनेक आयटी कंपन्या इथे कार्यालये थाटणार असून त्यातील आयटी प्रोफेशनल्स याच भागात राहावेत, अशी ही कल्पना आहे. अर्थातच अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक येथे आहे. आज  राज्यात कुठे नसेल असा सुमारे ४० किमीचा रस्ता पुण्यातून थेट लवासाला तयार करण्यात आलेला आहे. याच रस्त्यावर टोल नाका झाला आहे.


भौगोलिक दृष्ट्या परिसर :
          या १८ गावांत शेती जमिनीबरोबर वन जमिनीचे क्षेत्रही मोठ्याप्रमाणावर आहे.  हा सगळा भाग दाट झाडाझुडुपांनी, डोंगराळ भागांनी वढलेला आहे. शतकानुशतके वाढलेले मोठे वृक्षसंपादा या ठिकाणी आहे. गावांमध्ये जुने रस्ते आहेत काही ठिकाणी पायवाटा आहेत. लवासा प्रकल्प ज्या ठिकाणी पूर्ण होतोय त्या ठिकाणी डोंगर उतारावर शेकडो वर्षांपासून ठाकर, कातकरी व धनगर, कुणबी शेतकरी कुटुंब करून राहतात.
दासवे, मुगाव आणि नासा, लवार्डे  या ठिकाणी अनेक ठिकाणी डोंगरावरील झाडे बांधकामासाठी तोडण्यात आली. काही ठिकाणी झाडे लावण्यातही आली आहेत.  पण ती किती प्रमाणात याचा प्रश्न पडतो आहे.
          पुणे जिल्ह्यातल्या मोसे खोºयात खडकवासला धरणाच्या मागे वरसगाव नावाचं एक धरण आहे. वरसगाव धरणाचं २५ किलोमीटर लांबीचं पाणलोट क्षेत्र  आहे. मुळातच दुर्गम असलेला हा भाग पूर्वी सहजरित्या पोहचण्यास अवघड होता. हे संपूर्ण पाणलोट क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं ठरवल्यानंतर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही संपूर्ण जमीन विकत? घ्यायला सुरूवात केली. यातील १२५०० एकर विकसित करण्याची ही योजना आहे.
          कोणत्याही राज्यात धरणे बांधण्यासाठी प्रथम केंद्रशासन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागते. या परवानगीनंतरच देशाच्या मालकीचे होते. या धरणामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुन्हा केंद्र शासनाची परवानगी लागते. वरसगाव धरणामध्ये मागील बाजूस आणखीन एक धरण बांधण्याचे अधिकार लवासाला देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे नवीन नियम कायद्यात करून धनाढ्य लोक कायद्यात तुरतुद असल्याचे सांगत आहे.   या धरणामुळे वरसगाव धरणातील ५ टीएमसी पाणी अडविले जाणार आहे. या पाण्याची मालकी लवासाकडेच आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे २ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी लवासाने मिळवली आहे.  हे वाढीव धरण बांधण्यापूर्वी वरसगाव धरणातल्या पाण्यावरचा अधिकार जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योगक्षेत्र यांचा होता. तो आता नष्ट होणार असल्याच्या बातम्याही वाचण्यास मिळू लागल्या आहेत. लेकसिटीमधील हॉटेल्स, बंगले, बागा, उद्याने, क्रीडा अशासाठी हे पाणी वापरले जाणार आहे.

धरणे :
          पुणे  जिल्ह्य़ाच्या पश्चिम हद्दीच्या सीमेवर सह्याद्रीच्या प्रचंड पर्वतरांगा आहे.  या डोंगर फाटय़ांच्या बेचक्यामध्ये डोंगरात उगम पावलेले नदीनाले यांची खोरी आहेत. घाटमाथ्यावर वारेमाप पाऊस पडतो नव्हे कोसळतो. येथे नसिर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला दिसते. हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने या खोºयात अनेक धरणे बांधलेली आहेत. या डोंगरातून अनेक झरे मिळून टेकपोळे व धामण ओहोळ नजीक अंबी नदी व मोशी नदी उगम पावते.
          ब्रिटिशकालात पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला १६ किमी अंतरावर मुठा नदीवर धरण बांधण्यात आले.  मुठा उजव्या कालव्याने पुणे शहर व शेतीसाठी पाणी पोचवले जाई. शहराची व शेतीसाठी वाढणारी गरज लक्षात घेऊन १९५७  साली मुठा खोºयात म्हणजेच खडकवासल्याच्या वरील क्षेत्रात पानशेत  या ठिकाणी धरणाचे बांधकाम सुरू झाले. काम अर्धेकच्चे असतानाच १२ जुलै १९६१ रोजी धरण फुटले याच्या तडाख्याने खडकवासला धरणही फुटले. अर्थातच याचा फटका जनसामान्यांना बसलाच. १९७५ साली पानशेत धरण पुन्हा बांधण्यात आले.
          मुठेच्या दोन उपनद्या आहेत एक अंबी व दुसरी मोशी या अंबी नदीवर पुण्याच्या पश्चिमेस अंदाजे ४० कि. मी. वर पानशेतजवळ तानाजी सागर तर मोशी नदीवर वरसगावजवळ वीर बाजी पासलकर सागर आणि मुठा नदीवर टेमघर अशी धरणे बांधण्यात आली.  टेमघरच्या उत्तरेस मुळा नदीवर टाटांचे मुळशी धरण आहे.  वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांमधील पाणी मुठा नदीच्या पात्रातून खडकवासला धरणात व तेथून कालव्याने व पाइपने पुण्यास आणले जाते.
          पुणे शहराला पानशेत, खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाणी पिण्यासाठी मिळते. या तीनही धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहराला अंदाजे १४ टीएमसी पाण्याची गरज भासते. जिल्ह्यातील शेतीसाठी १८ टीएमसी पाणी वापरले जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी ०.४० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाते. अशा परिस्थितीत लवासाच्या बांधकामासाठी ३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.


निसर्गाची हानी :
          येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, तलाव, क्रीडांगणे आादी बांधण्यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणात डोंगर खोदाई सुरू आहे.  हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. जांभूळ, आंबा, फणस, हिरडा, शिकेकाई, बेहडा, खैर, ऐन, कडुलिंब, करंज, पळस, शिसम, आवळा, कोकम, बांबू, तसेच अनेक औषधी वनस्पतींचे इथे नैसर्गिक भांडार आहे.  तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. या समृद्ध निसर्गाचे या ‘पर्यटन’ स्थळामुळे काय हानी होईल ते काळाच ठरवेल.


नैसर्गिक संपत्तीची हानी
          या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीची हानी तर होत नाही ना असा प्रश्न उभा राहातो. आणि ही हानी तरी कशासाठी पर्यटनासाठी. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. नाहीतर नैसर्गिक अन्नसाखळी तुटण्याची शक्यता आहे.  ही सारी मानवनिर्मित शहरे आज मुळशी, भाटगर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना या धरणाच्या पाण्याची वाट लावणार आहेत. याचा थेट परिणाम पुणे व आजुबाजूच्या लोकवस्तीवर झाल्यावाचून राहणार नाही.
          लवासाचे हे मानवनिर्मित ‘हिल’ स्टेशन उभारताना अनेक ठिकाणी डोंगर ‘किल’ केलेले दिसतात. त्याशिवाय एवढा मोठा रस्ता, खिशाला न परवडणारे येथील अवाढव्य गृहप्रकल्प हे झालेच नसते. डोंगरांचे सपाटीकरण करून उभे केलेले हे हिल स्टेशन म्हणले तर वावगे ठरणार आहे. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे भरपूर आहेत महाबळेश्वर, माथेरान, आंबोली येथे  हिल स्टेशन बांधली जातात. परंतु तेथील पर्यावरणाला धक्का न लावता? लवासातील डोंगर तीव्र उताराचे आहेत आणि त्यावर माथे विस्तीर्ण नाहीत अर्थातच हा प्रकल्प डोंगर सपाट करून काही ठिकाणी झाडांची कत्तल करून पूर्ण करावा लागणार आहे.
          सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असलेले हे आधुनिक शहर राहणार आहे. सध्या वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून अनेक खेडोपाडी वंचित आहे. सध्या पडलेला २०१३ सालचा कोरडा भीषण दुष्काळ पाहता अशा प्रकल्पांना राज्य सरकार परवानगी तरी कशी देते याचे गौडबंगाल काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. हिलस्टेशनची महागडी घरे, तेथील उच्चभ्रू स्कूल, वाहतुकीसाठी एअर कंडिशन बस या सेवा नाहीतर काय कामाच्या.  पर्यावरणाची मानवनिर्मित हानी पाहून मन खिन्न होते. आपण एक दिवसाची पिकनिक म्हणून या क्षेत्राकडे न पाहता येणाºया पिढीसाठी निसर्ग ठेवणार आहोत का नाही याचा विचार करायला हवा. ‘मला काय त्याचे’ हे धोरण आता थांबविले पाहिजे.
          पर्यावरणाच्या प्रश्नावरून लवासा वादात असतानाच आणखीन एका खासगी हिल स्टेशन उभे राहू लागले आहे. तेही मुळशी तालुक्यातच. मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, माजगाव बार्फे, भांबुर्डे, एकोले, घुटके, आडगाव येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला लागणारं पाणी मुळशी धरणातून मिळणार आहे.  जमीन खरेदी करण्याचा काम सध्या जोरात सुरू आहे.
          वरील लेख लिहण्यासाठी पुन्हा एकदा मी व मित्र लवासाला गेलो तेथील एकूण भौगोलिक परिस्थिती सध्या तेथील लोकवस्ती यांचा अभ्यास करून व काही वर्तमानपत्रात आलेल्या लेखाच्या आधारे हा लेख लिहीला आहे. चूका आढळल्यास जरूर कळवा. धन्यवाद
          
          आज रविवार होता. बरेच दिवस लवासाबद्दल ऐकत होतो. त्याबद्दल वर्तमानपत्रातून लेखही वाचले होते. येथे जाण्याचा मोह अवरेना  दुपारी 2 ला घर सोडले. हिंजवडी, माण, घोटावडे मार्गे पिरंगुट चौकातून रस्ता आहे.  काही किलोमीटर रस्ता खराब आहे. मात्र, 10 किमीअंतर पुण्यातून चांदणी चौकातून जाण्याचे वाचते. पिरंगुट सोडल्यानंतर लवासा सिटीचा सरळ रस्ता आहे. वाटेत वरसगावचे धरण दिसते.
          मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर,  भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव गावाच्या परिसरात हा प्रकल्प उभा आहे. लवासा सिटीकडे जाणारा रस्ता छानच आहे. येथील डोंगर तीव्र उताराचे आहेत. रस्ता नागमोडी व घाटाचा आहे. काही टर्न खूपच मास्त आहे. वाटेत लवासातर्फे दिवे लावले आहेत. रस्त्याच्या आजुबाजूला जास्त लोकवस्ती नाही. पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला लवासाकडे जाता येते. वाटेत भुगाव, लवार्डे,  दासवे  अशी गावे आहेत. याच रस्त्याने पुढे ताम्हीणी घाटात जाता येते.  दुपारी 4 ला लवासा सिटीत पोहचलो.
          येथील निसर्गदृश्य बघण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणारं आहे. वरून लवासा सिटीचा परिसर, पूल, आजुबाजूच्या इमारती, दिवाळीतल्या किल्लांवरील चित्रंसारख्याच दिसतात. लवासा सिटीत एक गार्डन असून, त्यात लहान मुलांसाठी खेळणी बसविलेली आहेत. गार्डन छान आहे. सायंकाळी 5.30 ला लवासा सिटीतून निघालो. चांदणी चौकात एक टोल आहे. 30 रुपयांचा. जाताना पिरंगुट मार्गे चांदणी चौकातून बाणेर मार्गे घरी पोहचलो.









2 comments:

,अनिरूध्द कार्येकर said...

लवासा पाडून वने, जंगले मानवनिर्मित का होईना करायला हवीत। आज सिमेंटच्या जंगलापेक्षा वनांची गरज आहे । तेथील पक्षी,झाडे , पशूंची गरज आहे । पृथ्वी फक्त निलाजऱ्या धनदांडग्यांची व राजकारण्यांची बिल्डरांची,ऊन्मत्त, माजखोर, पैसेवाल्या माणसांची नाही । परमेश्वरा, तू आहेस कारे या जगात? तुझ्या निसर्गासाठी तू माणसाला मार। हाल हाल करून मार पण निसर्ग जगव। निसर्ग आहे तरच माणूस नाहीतर काहीच नाही । या लवासावासियांसारख्या सर्वांचा शेवट कर व लवासा सारखी मानवनिर्मित शहरे तयार करणाऱ्या सगळ्यांना असं शासन कर की पाणी, पृथ्वी यासह सर्व पंचमहाभूतांचा अपमान करण्याची त्यांची कधीच हिंमत होऊ नये । करशील ना तू परमेश्वरा ?????

GURU said...

भारतात जागतिक दर्जाची शहरे निर्माण होणे गरजेचे आहे ते जर पुण्या सारख्या ऐतिहासिक शहराजवळ होत असेल तर स्वागतच आहे.फक्त निसर्गाची कमीत कमी हानी व्हवी,त्याचबरोबर झालेली हानी भरून काढण्यासाठी ठोस उपाय करणे याकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे. काही उदात्त करण्यासाठी काही त्याग करणे गरजेचे असते. उगाच विरोधासाठी विरोध किंवा प्रसिद्धी साठी विरोध चुकीचा आहे. अभ्यासू लोकांनी या प्रकल्पाचा अभ्यास करून यासाठी काही मौलिक व विधायक सूचना असतील तर त्या हटखोर पणा न करता निकोप चर्चेसाठी मांडल्या पाहिजेत.

कॉपी करू नका