Saturday, July 9, 2016

भाजेची कातळकला

पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल... ¸


             नुकतीच पाऊसला सुरूवात झाली होती. भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळातील अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. नेहमीच्या लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात गर्दीमध्ये जाऊन मनस्ताप सहन करत बसण्यापेक्षा या वेळी लोणावळ्याच्या अलिकडे असणाऱ्या मळवली येथील प्रसिद्ध भाजे लेणी पाहून वर्षाविहारासाठी जाण्याचे ठरले. मळवली येथील भाजे गाव तसे शेकडो वर्षांपूर्वी वसलेले. याच गावातील डोंगरावर ही लेणी कोरून ठेवलेली आहेत. लेणीच्या मागील बाजूला असलेल्या विसापूर किल्याच्या कुशीत भाजे लेणीचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास दडलेला आहे. येथूनच विसापूर व लोहगड किल्यावरही जाता येते. लेणीच्या पायथ्यापर्यंत चांगला गाडीमार्ग असल्याने मळवली स्थानकापासून चालत अथवा स्वत:च्या गाडीने येथपर्यंत दहा मिनिटातच पोहचता येते. भाजेगाव मळवली रेल्वे स्थानकापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. 
         पायथ्यापासून लेणीचे दर्शन होत नाही. पुरातत्व विभागाने लक्ष दिल्याकारणाने लेणी पाहयला जाण्याच्या मार्गावर चांगल्या पायºया तयार केल्या आहेत.  या पाय-यांवरून सुमारे २५० ते ३०० फुटांवर असलेल्या लेण्यांपर्यंत जायला वीस मिनिटं लागतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. सुमारे १२० पायºया चढून तिकीट घराकडे आपण पोहचतो.  दगडी बांधकाम केलेले एक तिकिट विक्री केंद्र डाव्या बाजूला लेणीच्या थोडे खाली उघडण्यात आले आहे.  तेथून काहीच अंतरावर भाजे लेणीला गेट उभारले आहे. वाटेत आपण चढून आलेला मार्ग व गावातील छोटी-छोटी होत गेलेली घरे, मंदिर व आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसतो. पावसाने तुंडूब भरलेली खाचरे, शेतात सुरू असलेली शेतकामाची लगबग न्याहाळत आपण पोहचतो. ते मुख्य लेणीपर्यंत. मावळातील या लेणींना मी अनेकवेळ विविध मित्रांबरोबर तर कधी एकटाच भेटी दिल्या आहेत. विसापूर, लोहगड, तुंग, तिकोना या किल्यांवर जाण्यासाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. पावसाळा असल्याने अनेक हौशी पर्यटक पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. अनेकजणांना वर काय आहे? याची माहितीही नव्हती. केवळ धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेली यातील काही मंडळी होती. लेणीच्या आवारात प्रवेश केला. समोर उभा होता. २००० वर्षांपूर्वीचा आपला इतिहास.










अप्रतिम चैत्यगृह

                प्रवेश केल्यानंतर प्रथम लक्ष जाते ते भव्य चैत्यागृहाकडे. भाजे येथील चैत्यकमान फार अप्रतिम आहे. १२ क्रमांकाची ही गुफा म्हणजे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह २७ फूट रूंद आहे आणि साधारण ६० फूट लांब आहे. एकूण २९ लेणी आहेत. चैत्यगृह आणि चैत्यागृहाच्या आजूबाजूला असलेले एकवीस विहार. चैत्यगृहाला व्हरांडा न खोदता चैत्यगृहाची कमान मुख्य कातळातच कोरली गेली आहे. अर्थातच पावसाचे पाणी झिरपून दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये ही चूक सुधारल्याचे दिसून येते. कार्ले गुंफा भाजे गुंफांनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षांनी खोदल्या गेल्या असव्यात असे सहज लक्षात येते.  पिंपळपानाच्या आकाराचे भव्य प्रवेशद्वार असून, अशीच रचना कर्जत येथील कोंडाणे  लेणीची सुद्धा असल्याचे आपल्या लक्षात येते. गुंफेच्या पुढच्या भागात खाली जमिनीवर व दोन्ही बाजूंच्या भिंतींवर लाकडी खुंट्या मारण्यासाठी खोदलेली चौरस आकाराची काही छिद्रे आहेत. पूर्वी चैत्यगृहाच्या बाहेर जमिनीपासून ते वरच्या कमानीपर्यंत एक मोठे लाकडी दरवाजा असला पाहिजे.  हे चैत्यगृह अतिशय साधे आहे व याच्या आतील भागात खांबावर असलेल्या काही बौद्ध चिन्हांचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारच्या शिल्पांचा किंवा कोरीव कामाचा अभाव आहे.
                  चैत्यागृहाच्या बाहेरील बाजूस कातळात कोरलेल्या कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, चैत्य गवाक्षांच्या माळा, कातळात खोदलेल्या सुंदर कड्या, भिक्षुंसाठी निवासस्थाची केलेली सोय, सुंदर कोरीवकामातून सूर्यप्रकाश येण्यासाठी तयार करण्यात आलेली जाळी आणि पडदे दिसून येतात. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड दिसते. तेथील कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत.  या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. अशीच शुभचिन्हे बेडसे येथील लेणीमध्येही पाहण्यास मिळतात. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे. चैत्यगृहात शेवटच्या भिंतीसमोर वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप आहे. प्राचीन काळी लेण्यांना चैत्यगृहात आतील बाजुने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. बेडसे लेणी जेव्हा इंग्रजांच्या कालावधीत सापडली. तेव्हा तेथे साहेब येणार म्हणून तेथील कर्मचाºयांनी चैत्यगृहातील ही अनमोल रंगकाम पुसून, खरडून काढले. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. बॅटरीच्या प्रकाशात मुख्य स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वतंत्र दगडात कोरून बसवलेले आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य म्हणावे लागेल. बावीस अर्धवतुर्ळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा लाकडी तुळयानी हे छताला आधार दिलेला आहे. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. वेगवेगळ्या गुफेत एकूण १२ शिलालेख आहेत. या लेखांमुळे या तुळयांबरोबर या लेण्यांनाही इसवी सन पूर्व दुसºया शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले.  सुरुवातीला असलेल्या पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी आधार दिलेला आहे. या लाकडी तुळया प्राचीन असण्याचा उल्लेख मात्र मनाला पटेनासा वाटतो. कारण जेथे किल्यातील दगड परिसरातील लोक घेऊन जातात. तेथे या लाकडाचे काय. चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील थोड्या कलत्या ठेऊन तासून काढलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील हा बहुदा कारागिरींचा उद्देश असावा. अर्थात नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये मात्र, अशा स्वरुपाची कलत्या स्तंभांची गरज नसल्याचे लक्षात आल्याने तशी रचना दिसत नाही.





                चैत्यगृह पाहून बाहेर मुख्य प्रांगणात आल्यानंतर शेजारी, दुमजली विहारांकडे जाता येते. काही विहार साधे तर काही कोरीव कामाने नटलेले दिसून येतात. भिक्षुंच्या योग्यतेप्रमाणे बहुधा हे कोरीवकाम केलेले असावे.  येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी दगडी कट्टा सुद्धा आहेत. काही कट्टांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसून येतात. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसºया शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली व पुढे तब्बल सातशे ते आठशे वर्षे ही लेणी कोरण्यासाठी छिन्नी व हाथोडे काम करत होते. ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली.
                महाराष्ट्रात असलेल्या लेणी बांधण्यासाठी खर्च येणारच.  बेडसे लेणीत, भाजे लेणीत अशा कामांसाठी देण्यात आलेले दानाचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या एका विहारातील एक लेख ब्राह्मी लिपीतील असून, या लेखांचे वाचन व आकलन इतिहासतज्ज्ञांना झाल्याने अनेक गोष्टींवर प्रकाश पडलेला आहे. या संपूर्ण लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसºया शतकात कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निमिर्तीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात.

‘बाध या हालिकजयांना दान’ याचा अर्थ असा, की ‘बाध या शेतकºयाच्या बायकोचे दान!
लेणी तयार करताना मुख्य प्रश्न पडतो. तो पिण्याच्या पाण्याचा भाज लेणीमध्ये ४ ते ५ पाण्याची टाकी आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेला पाण्याचे एक जुळे टाके आहे. ‘महारठी कोसिकीपुत विन्हुदत’ असा दानधर्माचा ब्राम्ही लिपीतील लेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे. या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत ओळीने कोरलेला १४ स्तूपांचा समूह दिसतो. या लेण्यात राहून गेलेल्या बौद्ध भिक्षूंची ही स्मारके आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. यालाच डागोबा असेही म्हणतात. डागोबा किंवा डागाबा हा सिंहली शब्द सामान्यपणे स्तूप या बौद्ध धर्मीय वास्तूचा निर्देश करण्याकरिता श्रीलंकेमध्ये रूढ आहे. हा शब्द ‘धातुगर्भ’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजतात. धातू याचा अर्थ अवशेष. असा अवशेष ज्याच्या गर्भात तो धातुगर्भ स्तूप = डागोबा. स्तूपाच्या अंडाकृती भागास हा विशेषकरून वापरतात, कारण त्यात अवशेषांचा लहान करंड असतो.


‘सूर्यलेणे’






 

                १४ स्तूपांच्या समुहावर सध्या शेड टाकल्याने थोडे संरक्षण मिळाले आहे. तसे संपूर्ण लेणीभोवती संरक्षण जाळी टाकल्याने परिसरातील जनावरांना अटकाव मिळतो. येथून थोडे पुढे  गेल्यावर डाव्या बाजूला कातळात दिसते ते ‘सूर्यलेणे’. १८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले हे लेणे सापडले. ‘सूर्यलेणे’ असे त्याचे नाव. व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. सध्या पर्यटकांसाठी आतील ठिकाण कुलूप लावून बंद करण्यात आलेल्याने थोडेतरी संरक्षित झाले आहे. हे लेणे म्हणजे विहार (बौद्ध भिक्षुंसाठी आरामाची जागा) आहे.
 



सूर्य आणि इंद्राचा देखावा

           शस्त्रधारी द्वारपाल, हिंदु पौराणिक प्रसंग आणि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम येथे कोरून ठेवले आहे. या विहाराच्या उजव्या भिंतीवर देखावा आहे. सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात मागे-पुढे दोन स्त्रिया असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. रथाचे चाक, हातातील चाबुक, पुरुष व स्त्रिया या नीट न्याहाळल्यास आपल्या त्यातील अर्थ कळू लागतो.  दुसºया बाजुला असलेल्या शिल्पात इंद्र हत्तीवर बसलेला दिसून येतो. एका हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर दाखवले  आहेत. तबला वाजवताना एक इसम ही दाखवला आहे. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर त्यावेळच्या शिल्पकारांनी कोरून ठेवलेली आहेत.
           सूर्यलेणीच्या थोड्याश्या अंतरावर दोन विहार आहेत. विहारासमोरच वरील डोंगरातून येणारा धबधबा आपले मन मोहून टाकतो. पुरातत्व विभागाने जाळी लावून लेणीला संरक्षण दिले आहे. मात्र, काही पर्यटकांनी येथील जाळी तोडून डोंगरावरून येणाºया या धबधब्याखाली जाण्यासाठी वाट केली आहे. मात्र, हे किती धोकादायक आहे हे येथे येऊनच कळते. घसरडे असल्या कारणाने आम्ही काही खाली उतरलो नाही.
         सुमारे अर्धा ते पाऊणतासात लेणीचे दर्शन घेऊन आम्ही लेणी उतरलो. वाटेत असलेल्या धबधब्यातून येणाºया पाण्यामध्ये बसून, चिंब ओले होऊन वर्षाविहाराचा आनंद लुटला.
एकदा तरी वेळेत वेळ काढून पाहून येण्यासारखी हे जागा आहे.
      इसवी सन पूर्व दुसºया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या.  लेणींचे हे प्रसिद्ध लेणं महाराष्टÑात सर्वदूरपर्यंत पोहचले. पुण्याच्या जवळ असलेली  कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, तसेच भंडारा डोंगरावरील लेणी, घोरावडेश्वरावरील लेणी तसेच जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कºहाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची प्रसिद्ध लेणी. प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके बंंदरावरील माल देशावर आणण्याचा हा मार्ग होता. बौद्ध भिक्षुंसाठी हा नेहमीचा वापरात येणारा व्यापारी मार्ग होता.  थेट कोकण ते घाटमार्ग जोडणारा हा मार्ग आपल्याला जुन्नर, नाणेघाटात जायचा.  अर्थातच विश्रांतीसाठी तसेच ध्यानधारणा करण्यासाठी अशा अनेक लेणी खोदण्यात आल्या. डोंगरातील कपारींमध्ये गुफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून अन्य ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले असावेत. भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व २०० च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व २७२) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत.  लेणींमध्ये स्तूप उभारले गेले. स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम करण्यात येई.  आदर दर्शविण्यासाठी एक छोटी छत्री उभारली जाई.  चैत्यगृहाच्या आत असलेला दगडी स्तूप बांधलेला आहे. हे स्तूप जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे.  हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जाते. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.

पुरातत्व विभागाच्या  फलकावरील माहिती  : 

 

लेणीच्या मुख्य दरासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाने माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीतील ही माहिती पर्यटकांना माहिती देण्यास चांगलीच मदत करते.
'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या २९ गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखालचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण १२ शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दि. २६-५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'

काही इतर गोष्टी :

चैत्यगृहाच्या स्तूपावर तीन प्रयत्नात नाणं फेकून आपली मनोकामना पूर्ण करण्याची नवीन पद्धत  सुरू झाली आहे. हे फेकलेले नाणे स्तुपावर राहील्यास अथवा  घरंगळ्यास त्याची मनोकामना पूर्ण होते. अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी सर्वच लेणींमध्ये होत असतात. अर्थातच अशा अंधश्रद्धेला काय अर्थ आहे.

अशा पर्यटन स्थळी येताना तरी कपडे घालून येण्याचे साधे भान सध्याच्या तरुणीईला नसल्याचे पाहून वाईट वाटते. पुरुषांना सुद्धा लाजवेल अशा हाफ पॅन्ट घालून, अंगात तोकडे कपडे घालून  विक्षिप्तपणे वागत, लेणी परिसरात हिंडत होते. बाहेरील स्तूपांबरोबर सेल्फी काढणारे पाहून वाईट वाटले. केवळ पावसात भिजण्याचा आंनद घेणाºयांना लेणीविषयी जरा सुद्धा माहिती घेण्याची इच्छा होत नाही. महाराष्ट्रातील या लेणी आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची मंदिराप्रमाणे पूजा जरी होत नसली तरी मंदिरासारखे पावित्र्य नक्कीच जपायला हवे. पेपरात पावसाळा सुरू झाला की धबधब्यात वाहून जाणारे तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या यायला लागतात. पावसाळा नक्कीच आनंदाने साजरा करा. मात्र थोडेतरी भान ठेवायला हवे. आम्ही धबधब्यातून येणाºया पाण्याखाली उभे होतो तर काही महाभाग जेथे धबधबा कोसळतो त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात मग्न होते. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय सटकतो. याचे जराही भान न ठेवता पावसाळा एन्जाय केला जातो.

भाजे गावाविषयी :

भाजे हे एक लहानसे गाव. पुणे जिल्ह्यातील वडगाव पासून काहीच अंतरावर असलेल्या मळवली येते. पुण्याहून जुन्या हायवेने मुंबईला जातांना कार्ला फाटा लागतो. येथून डाव्या बाजुने मळवली रेल्वेस्टेशनाचा ओव्हर ब्रीज ओलांडून भाजे गावात जाता येते. या गावातून डाव्या बाजूने लोहगडकडे जाणा-या रस्त्याला लागूनच डाव्या बाजूच्या विसापुर किल्याच्या डोंगराला लागून असलेल्या डोंगरात भाजे लेण्यांचा समूह आहे. भाजे येथे २३ जुलै १९८९ रोजी अतिवृष्टीमुळे डोंगरपायथ्याला असलेल्या चार घरांवर दरड कोसळून ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

कसे जाल :

  • पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर भाजे लेणी आहे.
  • पुण्याहुन लोकलने लोणावळ्याकडे जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनिटांच्या अंतरावर ही लेणी आहेत.
  • मुंबईहून एक्सप्रेस वे मार्ग येत असल्यास लोणावळ्याला बाहेर पडून मळवलीपर्यंत येता येईल.  तेथून मळवली गावाकडे जाताना रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुलावरून भाजे गावात येत येईल.
  • जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने गेल्यास कार्ला (एकवीरा माता) कडे जाण्यासाठी एक चौक लागतो. येथून डावीकडे वळून कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणी आहेत.


अजून काय पाहाल

मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर येथून जवळच असलेले लोहगड व विसापूर किल्ले आपले स्वागत करतात. वाहन असल्यास सुमारे अर्धा तासात लोहगडवाडीपर्यंत गाडीरस्ता आहे. मात्र, काहीसा वळणावळण असल्याने गाडी जपून चालवलेली चांगलीच. येथून पुढे उजव्या बाजूने लोहगडाला वळसा घालून गेल्यास उर्से येथील खिंडीतून पवना धरण, तुंग, तिकोना, पौड रस्त्याला जाता येते. मात्र, पावसाळ्यात शक्यतो हा मार्ग नवख्यांनी वापरू नये कारण या खिंडीत अनेकवेळा दरड कोसळत असते.

तिकीट दर : 

भारतीयांसाठी प्रत्येकी १५ रुपये नाममात्र, तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये.

पार्किंग : 

भाजे गावात पोहचल्यावर मोठ्या पटांगणात मोफत पार्किंगची सुविधा आहे.

हॉटेल्स : 

पर्यटन स्थळ विकसीत झाल्यामुळे गावात चौकशी केल्यास जेवणाची सोय होऊ शकते.

...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...

Friday, January 22, 2016

जझीरे मेहरूब : जंजिरा किल्ला

महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या सागरी किनाऱ्याजवळ प्रेक्षणीय, ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी अनेक पर्यटनस्थळे आहेत. अनेक गिरीदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग या ठिकाणी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी शतकानुशतके उभे आहेत. या समुद्र किनाऱ्यावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळा वेगळा आनंदच. हा आनंद घ्यायचा झाल्यास सुरूवात होते ते रेवस बंदरापासून व संपते तेरेखोलला. अलिबाग-मुरुड परिसरात अनेक पर्यटनस्थळे विकसित झालेली आहेत. मांडवा, सासवणे, आवास, किहीम, अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, काशिद, नांदगाव, रेवदंडा, मुरुड या ठिकाणी मनमुराद आनंद लुटता येतो. वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची ये-जा सुरू असते. नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी माणसाचे, समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहूबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी अजेय जंजिरा किल्ला आहे. त्या विषयी...

जुन्या द्रुतगती मार्गावरून खोपोलीला आलो. तेथून अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीच्या गजाननाचे दर्शन घेऊन रोह्याला गेलो. पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते मात्र, साळवला न जाता वाटेत डावीकडे असणाऱ्या फणसाड अभयारण्यातून सुपेगावमार्गे गेलो. एव्हाना दुपारचे १२.३० वाजले होते. सुपेगावमार्गे जाण्याचा माझा हा तिसरा अनुभव होता. वाटेत फणसाड अभयारण्य स्वागत करते.  सोबतीला  गुगल मॅपची मदत होतीच. त्यामुळे वाट चुकण्याचा प्रसंग नव्हता. घनदाट अभयारण्यातून चांगला काळा डांबरीरोड तयार केलेला आहे. एकदम शॉर्प टर्न असल्याने शक्यतो गाडी नवीन चालविणाºयांनी या ठिकाणाहून जाणे टाळावेच. वाटेत घनदाट जंगल असल्याने शक्यतो दिवसाढवळ्या येथून बाहेर पडणेच चांगले. अर्ध्या तासातच वेडीवाकडी वळणे घेत आम्ही मोºया बंदराजवळ पोहचलो. येथून जंजिºयाला जाण्यासाठी बोटीची सोय होऊ शकते. या खेरीज राजपुरी गावातूनही शिड्याच्या बोटीने जंजिºयाला जाता येते.

किल्याचे स्थान :

रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबीसमुद्र पसरलेला आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरूड हे एक तालुक्याचे गाव. गावाचा परिसर निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा परिसर हिरवागार झाला आहे. परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा ‘नवाबा’चा राजवाडा' म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी दंडा आणि राजपुरी ही गावे आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या पश्चिमेला समुद्रात सुमारे २ किलोमीटरवर एका बेटावर जंजिरा किल्ला आहे. राजपुरीहून येथे जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.


थोडा कंटाळवाणा; पण हवाहवासा वाटणारा प्रवास :

आजपर्यंत शत्रूला पटकन वश न झालेला हा अजिंक्य सिद्दयांचा जंजिरा किल्ला.  आमच्या ताब्यात येण्यासही सुमारे ३ तासांचा वेळ गेला. उन्हाचा मारा सोसत, कंटाळलेल्या स्थितीत ही मोर्ऱ्या बंदरात तिकीट रांगेत उभे होतो. मोर्ऱ्या बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी दर अर्धा तासाने बोटीची सोय होते. आम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी डिझेलच्या लाँचमध्ये बसून गेलो. प्रथमत: भल्या मोठ्या रांगेत उभे राहून तिकीट घ्यायचे. तिकीट तसे किरकोळच आहे. २२ रुपये प्रौढांसाठी तर ११ रुपये १२ वर्षांखालील लहान मुलांसाठी. एक वेळेस फक्त ४५ तिकीटेच दिली जातात. तिकीट देणाऱ्या माणसाशी कुठलीही चौकशी केली असा वाट पाहावी लागेल. सांगता येत नाही, राजपुरी बंदरातून जा ना, अशी उत्तरे दिली जातात. तिकीट काढल्यानंतर तासभर वाट पाहावी लागते. नावाड्यांनी सोसायटी स्थापन केली आहे. जास्त कटकट करणाऱ्या प्रवाशांना सोसायटीकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला जातो. नावाड्यांचा धंदा व्हावा म्हणून पर्यटकांची छान दमवणूक करतात.  जास्त घाई करणाऱ्यांना फक्त ५० रुपये देऊन किल्ल्याच्या भोवताली फिरवून आणण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र त्यासाठी ४५ माणसांची तयारी हवी. किल्ल्यावर सोडण्यासाठी येणाऱ्या लाँच परतीचे पॅसेंजर घेऊन येते. मग तिकीटे काढलेली नवीन पर्यटक लाँचमध्ये बसतात. तेथून ही लाँच जंजिºयाकडे जाण्यासाठी निघते. किल्याच्या मुख्य दरवाज्यासमोर अनेक शिड्याच्या होड्या पर्यटकांनी भरून थांबलेल्या दिसतात. मग एक-एक करीत आपल्या लाँचमधील माणसे दुसऱ्या शिडाच्या होडीत बसवली जातात. मग ही शिडाची होडी दरवाज्याजवळ येऊन माणसे तेथील नावाड्यांच्या मदतीने खाली करतात. या सगळ्या द्रवीडप्राणायाने गोंधळ व संभ्रम निर्माण होतो. सरळ लाँचनेच आपल्याला का  नाही सोडले? तर मुरुड जंजिरा पर्यटन संस्थेतर्फे  शिडांच्या होडींचा धंदा चालू राहण्यासाठी केलेली ही उपाययोजना असल्याचे न सांगताच लक्षात येते. ज्या नावेतून आपण आलो तीच नाव सुमारे ४५ मिनिटांनंतर येथे आवाज दिल्यानंतर दरवाज्यामध्ये  येऊन थांबायचे यानंतर नाव चुकल्यास भाडे जास्त आकारले जाते अशी धमकीवजा घोषणा नावाड्याकडून केली जाते. म्हणजेच मोºया बंदरातून निघालेली लाँच अर्ध्यातासातच किल्याच्या दरवाज्यापाशी येऊन थांबते. तेथून शिडाच्या होडीत बसायचे नंबर लागेल तसा शिडाच्या होड्यातून किल्यावर उतरायचे या सगळ्या गोष्टीला दीड तास तरी सहज लागतो. प्रत्यक्षात किल्ला पाहण्यासाठी ४५ मिनिटांचाच अवधी दिला जातो. असो.  सर्व पर्यटकांना नावाडी आपुलकीने वागवताना दिसतात. पोट भरण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या येथील लोकांना पर्यटक म्हणजे देवच. आदबीने चौकशी करून किल्ला पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला १०० रुपये याप्रमाणे गाईडची सोयही केली जाते.  खरे पाहता थोडी इतिहासाची आवड असल्यास स्वत:हून हा किल्ला पाहता येणे शक्य असते. येथील गाईड अभिमानाने ‘‘तुम्हारा शिवाजी भी ये किला जीत नाही पाया’’ असे अभिमानाने सांगतात. शंभर रुपये देऊन ही बडबड ऐकण्यापेक्षा स्वत: किल्ला पाहिलेला बरा.  आम्ही गाईड न घेताच हा किल्ला पाहिला. होडीतून उतरताना होणारी इतरांची होणारी धांदल पाहण्यात चांगली मजा येते. भरती असल्यास नाव जोरात वरखाली होत असते अशातच नावाड्याच्या हाताला धरून बरोबर पायरीवर उडी मारावी लागते. चुकून पाय घसरला की थेट समुद्राच्या पाण्यात छोटी डुबकी होते.

जंजिºयाविषयी :

मुरूडच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. जंजिरा किल्ला राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. अरबी भाषेतील ‘जझीरा’ या शब्दावरुन तो आलेला आहे.  ‘जझीरा’ म्हणजे बेट त्याचा अपभ्रंश झाला जंजिरा. मेहरूब शब्दाचा अर्थ चंद्रकोर.  ‘जझीरे मेहरूब’.  सुमारे ५०० वर्षे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आजही भक्कमपणे उभा असलेला हा किल्ला. यादवकाळात दंडाराजपुरी हे भरभराटीस आलेले महत्वाचे व्यापारी बंद म्हणून प्रसिद्ध होते.  दहाव्या शतकाच्या सुमारास राष्ट्रकुटांचे मांडलिक शिलाहार राजांचे कोकणावर राज्य होते. तेव्हापासून राजपुरी बंदराचा उल्लेख इतिहासात आपल्याला मिळतो. पण जंजिºयाचा इतिहास सांगताना आपल्याला १५ व्या शतकापासून सुरूवात करावी लागते. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना समुद्री लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच त्रास होत असे. तेव्हा या चोरांना आळा घालण्यासाठी या दगडी बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक ठोकून तयार केलेली भव्य तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. साहजीकच मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला.
जुन्नरच्या मलिक अहमदने १४८५ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. राम पाटीलाचा पराक्रमापुढे मलिकने हात टेकले. यानंतर चार वर्षानंतर एक व्यापारी जहाज जंजिºयाच्या तटाला लागले. पिरमखान नावाचा व्यापारी व त्याच्या सिद्दी नोकरांनी सुरतेहून आल्याची बतावणी केली व आसरा मागितला. राम पाटील सहजासहजी आपल्याला मेढेकोटच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमखानला होती. आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून त्याने आपले गलबत खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूचे काही पिंपे भेट म्हणून पाठवली.  रात्री पिरमखानने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखान बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून रात्रीच्या अंधारात भयंकर कापाकापी झाली, सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पेरीमखानाच्या जागी बुºहाणखानाची नेमणूक झाली. राम पाटीलला निजामशहाकडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. पुढे स्वतंत्र गमावलेला राम पाटील १५२८ मध्ये पुन्हा बंडखोरी करू लागला. तेव्हा पिरमखानाने त्याचे डोके उडवले. इ.स. १५२६ ते १५३२ च्या कारकीर्दीनंतर इ.स. १५३२ मध्ये पिरामखान मरण पावला. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी बांधकामाऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स. १५७१ पर्यंत सुरू होते. आणि याचाच तयार झाला दगडी कोट ‘किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १५५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमणूक झाली. १६१२ याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली. याच्या मृत्यूनंतर १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिद्धी सुरुदखान हा ठाणेदार झाला. इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. यानंतर सुमारे १९४८ पर्यंत २० सिद्दी नवाबांनी जंजिºयावर ३३० वर्षे सत्ता गाजवली. सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना ३ एप्रिल १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

अजिंक्य किल्ला

जंजिºयाचे हे  सिद्दी हे मूळचे अरबस्तानाशेजारच्या अबिसीनियामधील म्हणजेच हबसाणातून (सध्याचा अफ्रिकेतील एथोपीया) आलेले.  धर्माने  मुस्लिम आणि पंथाने सुन्नी असणारे हे लोक सैद या जमातीचे होते. म्हणून त्यांना पुढे सिद्दी म्हणून लागते. हे दर्यावर्दी लोक शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. जंजिरा संस्थानाला 'हबसाण जंजिरा ' असे म्हणत. त्या वेळच्या नाण्यांवरही हबसाण जंजिरा असा उल्लेख आहे. किल्याच्या प्रवेशद्वारावर एक मुद्रा कोरली आहे, ज्यात सिद्दी लोकांचे चित्र दिसते. उर्दू भाषेत लिहिलेली ही वाक्य आहेत.  जंजिºयाचे हे सिद्दी आफ्रिकेतून आले होते. किल्यामध्ये जवळ जवळ १९६० पर्यंत वस्ती होती. नंतर त्या सर्व लोकांना किल्ला सोडण्याचा आदेश दिला गेला. मग ते मुरुड आणि नजिकच्या परिसरात स्थायिक झाले. १४ आॅगस्ट १६५७ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या हाती मोहीम दिली होती पण त्या स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेत अपयश हाती आले. मे १६६९ ला महाराजांनी स्वत: मोहीम आखली. पण ती यशस्वी होऊ शकली नाही. या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता. शिवाजी महाराजांनी या किल्याजवळच सुमारे ५ ते ६ कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबुत किल्ला उभारला होता.  यानंतर १६८२ मध्ये छत्रपती संभाजीमहाराजांनीही जंजिरा घेण्याचा प्रयत्न केला. संभाजीमहाराजांनी सुद्धा राजपुरीचा डोंगर फोडून सेतू बांधला होता. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता. मात्र, ऐनवेळी खुद्द औरंगजेब दख्खनमध्ये उतरल्याने स्वराज्यासाठी संभाजीमहाराजांना ही मोहीम अर्धवट ठेवावी लागली.  पोतुर्गीज , इंग्रजांनाही हा किल्ला मिळवता आला नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा वेळा तर छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा व पेशवेकाळात पाच वेळा असे एकूण बारा प्रयत्न मराठ्यांकडून केले गेले. पण मुळातच चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या, प्रचंड लाटा, अभेद्य तटंबदी, अभेद्य सिद्दीची कडवट माणसे तसेच किल्ला बांधताना दोन दगडांच्या सांध्यात शिशे ओतल्याने दगड





झालेला हा किल्ला. यामुळे जंजिरा घेण्याचा प्रयत्न फसला गेला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय जंजिराच्या तटावर ५७२ तोफा होत्या. सध्या सुमारे ७५ लहान मोठ्या तोफा किल्यात दुरवस्थेत विखुरलेल्या स्वरुपात दिसून येतात. शत्रूच्या छातीत धडकी भरवतील अशा तीन अजस्त्र तोफा आहेत.  ‘चावरी’, ‘लांडा कासम’ आणि सर्वात मोठी व लांब मारा करून शकणारी ‘कलाल बांगडी’ तोफ. किल्ल्याला अभेद्य ठेवण्यात या तोफांची खरी कामगिरी आहे हे नक्कीच. किल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक लाकडी दार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक भिंतीवर शिल्प आहे. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले असून, शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते शिल्प आहे. या चित्रातून जणू काही बुºहाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, ‘तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. नाही तर गाठ माझ्याशी आहे.’’  सिद्दीने इथल्या सर्व शाह्यांना गुंडाळून टाकल्याचे ते चिन्ह आहे. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.

किल्याविषयी :

किल्याची तटबंदी अभेद्य तर आहेच. पण एकामागून एक असे २२ अधिक २ बुरुजांची साखळी या किल्लाला अधिक अभेद्य करते. आपण प्रवेश करतो तो मुख्य दरवाजा येथून दोन बुरुजांमधील अंतर सुमारे ९० फुटांपेक्षा जास्त आहे. गाईडशिवाय गाड पाहावयाचा झाल्यास दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडील तटबंदीवरून तोफा पाहत गेल्यास अर्धा किल्ला पाहता येतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग आतून पायºया आहेत. या पायºयांखालील मागील बुरुजांमध्ये सैनिकांसाठी टेहळणी करण्यासाठी खोल्याही बांधल्या आहेत. येथील दगडी कमानीवरील नक्षीकाम सुंदर आहे.  किल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे.
तटबंदीमधील कमानीमध्ये तोंड बाहेरू करून तोफा रचलेल्या आहेत. गडावरील पाहण्यासारख्या तोफा म्हणजे कलालबांगडी, लांडाकासम व चावरी. प्रचंड उन्ह, पाऊस आणि थंडीतही या तोफा इतके वर्षे टिकून आहेत. विशेष म्हणजे उन कितीही असले तरी या तोफांवर आरामात हात ठेवता येतो. उन्हामुळे त्या गरम होत नाहीत. बुरुजांच्या तटात खोल्या, कोठारे, उघड्या जंग्यांमधून बाहेर ‘आ’ वासून  डोकावणाऱ्या अजस्त्र तोफा व तेथून दिसणारे समुद्राचे दर्शन मनाला भुरुळ घालते. किल्ल्याच्या मध्यभागी सिद्दी रसूलखानाचा वाडा पडक्या अवस्थेत दिसून येतो.


संपूर्ण किल्ल्यावर पाण्याचे दोन मोठे गोडे तलाव आहेत. विशेष म्हणजे त्या काळी  हे पाणी पिण्यासाठी वापरत असत. अजूनही गडावरील तलाव पर्यटकांसाठी बंद करून  वरती पिण्यासाठी वापर केला जातो. पाणी पिण्यासाठी मोफत मात्र बाटलीत भरून घेण्यासाठी १० रुपये मोजावे लागतात. बरोबरच आहे. कारण पर्यटकांनी या तलावांमध्ये रिकाम्या बाटल्या, प्लॉस्टिकच्या पिशव्यांचा कचरा टाकून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.  तटबंदीवरुन आजुबाजूचा प्रदेश दिसतो. यात कासा उर्फ पद्मदुर्ग सामराजगड हेही येथून दिसतात. याशिवाय गडावर  पीरपंचायतन, घोड्याच्या पागा, सुरुलखानाचा वाडा सध्या पडकी इमारत दिसते

....आणखी काही फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

 

सदर :  

किल्ल्याच्या बाहेरून दिसणारी तटबंदीच्या आतमध्येही छोटेखानी तटबंदी हे या किल्ल्याचे वैशिष्टच म्हणावे लागेल. बालेकिल्ल्याच्या मागे इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात. तलावाच्या बाजूने काही पायºयांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला (किल्ल्यावरील उंच भाग) लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे. येथून किल्ल्याचा परिसर तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरावर लक्ष ठेवणे सहज शक्य होत आहे.

दर्या दरवाजा : 

गडाच्या पश्चिम बाजूला तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत असावा.

 

काही टिप्सच :

  • शक्यतो शनिवार व रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्या सोडून जंजिरा पहावा. अन्यथा प्रचंड गर्दीला सामोरे जावे लागेल.
  • किल्ला पाहण्यास फक्त ४५ मिनिटांचा कालावधी दिला जातो. आपण ज्या बोटीतून आलो आहे त्या बोटीचे नाव लक्षात ठेवावे. परत येताना दरवाज्यात थांबून बोटीचे नाव घेतल्यावर त्याच बोटीत बसावे अन्यथा चुकीच्या ठिकाणी पोहचाल.
  • किल्ल्यावर जरी पाणी असले तरी काही लोकांना ते पचत नाही. तेव्हा शक्यतो जवळ पाण्याची बाटली ठेवावी.
  • मुरुड गावात राहाण्याची सोय होऊ शकते. गावात जेवणाची सोय होते.
  • किल्ल्यावर जाण्यासाठी मुरुड गावापासून अर्धा तास लागतो. बोटींच्या क्षमतेनुसार. एका बोटीत सुमारे ४५ माणसेच बसवतात.
  • तिकीट दर : प्रौढांसाठी २२ रुपये (येऊन-जाऊन),  १२ वर्षांखालील : ११ रुपये

जंजिºयाला जाण्याच्या वाटा :

  • अलिबागमार्गे (मुंबईकरांना पेण, पनवेल मार्गे येण्यासाठी) : अलिबागमार्गे यायचे झाल्यास अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुडला जाता येते. मुरुड गावातून बोटसेवा आहे. हे अंतर सुमारे ५० ते ५५ किलोमीटर आहे.
  • पाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे:  (पुणेकरांना पाली-रोहा मार्गे येण्यासाठी : अलिबाग मार्गे न मुंबई गोव्या हायवेमार्गे जाता येते. फणसाड अभरण्यातून हा मार्ग जातो. वाटेत सुपेगाव लागते.
  • दिघीमार्गे:   कोकणातून यावयाचे झाल्यास महाड-गोरेगाव-म्हसळे-दिघी मार्गे किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.

....आणखी काही फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

...हा ब्लॉग कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया लिहा...

Saturday, January 16, 2016

८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण

८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत सध्या सुरू आहे. संमेलनाचे अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाची पीडीएफ स्वरुपातील भाषणाची प्रत खालील लिंकवर उपलब्ध करून देत आहे.






खालील ठिकाणी क्लिक करा....

८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण


८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भाषण 2

Monday, January 11, 2016

Monday, December 7, 2015

श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा

             गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने बाजीरावांच्या घोड्यावरील स्वार झालेल्या पुतळ्याकडे लक्ष वेधून विचारले, ‘‘बाबा हा शिवाजी का?  मी नाही म्हणताच मग कोण?  बाजीराव पेशवे म्हटल्यावर ते बाजीराव ‘सिंघम’ का? असा उलट प्रश्न त्याने केला. तो लहान असल्याने मी जास्त लक्ष दिले नाही. सध्याच्या पिढीला बाजीराव  सिंघम माहिती आहे मात्र, बाजीराव पेशवे माहिती नाही. मुलाला इतके दिवस आपण शनिवारवाडा कसा दाखविला नाही याचे मलाच आश्चर्य वाटले. गणपती पाहायला वेळ होता. तेव्हा तासाभरात शनिवारवाडा दाखवू असे ठरवून मुलाला शनिवारवाडा दाखवून आणला.  त्यानिमित्ताने का होईना मीही बºयाच वर्षांनी शनिवारवाडा पाहणार होतो. लहान असताना शनिवार पेठेतील आजी व मावशीकडे गेलो की मी, माझे मावसभाऊ असे सारेजण शनिवारवाड्यात लपाछपी खेळायला जायचो. मजा यायची.
      
मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेला ‘शनिवारवाडा’. पुण्यात शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला, हातात भाला घेऊन शत्रूच्या उरात धडकी भरणारा आवेशपूर्ण असा पुतळा दिसतो. बºयाच लोकांना (पुण्याच्या नव्हे) हा पुतळा कोणाचा समजत नाही. पुण्याच्या वाढत्या इमारतींच्या साम्राज्यात आपले जुने अस्तित्व टिकून राहिलेला हा शनिवारवाडा म्हटले की आठवण होते  बाजीरावांची. शत्रूच्या उरात धडकी भरणारा हा यौद्धा आपल्या अतुल पराक्रमामुळे अजय ठरला. बाजीरावांविषयी अनेक कथा, कादंबºया, ऐतिहासिक पुस्तके लिहिली गेली. त्यातील मी वाचलेली काही ऐतिहासिक पुस्तकांतील संदर्भ घेऊन बाजीरावांविषयी काही मुद्दे मांडण्यासाठी हा लेख प्रपंच. ‘ध’ चा ‘मा’ झाल्यास जरूर कळवा.


             ‘अ मॅन हू नेव्हर लॉस्ट अ बॅटल’ असं ज्याचं वर्णन केलं जातं. ज्यानं कधी पराभव पाहिला नाही, ज्यानं आपल्या मनगटाच्या जोरावर अनेक युद्ध जिंकली, दिल्ली काबीज केली. ज्याच्या पराक्रमामुळे इराणपर्यंतच्या पातशाह्या हादरल्या त्या जगातल्या एकमेव, अजेय, अपराजित यौद्धाचे नाव म्हणजे ‘बाजीराव’. उत्तम संघटनकौशल्य असलेला हा पराक्रमी यौद्धा. मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती.  बाजीरावांनी दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता.

बाळाजी विश्वनाथ भट : (पेशवे)

              बाळाजी विश्वनाथ भट हे  मुळचे कोकणातील श्रीवर्धनचे. त्यांचा घराण्याकडे दंडाराजपुरी व श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० सालापासून होती. दंडाराजपुरी तेथून जवळच जंजिरा त्यामुळे साहाजिकच सिध्दीच्या त्रासाला कंटाळून बाळाजी देशावर आले. ताराबाई राजारामाची कर्तबगार पत्नी. राजारामाच्या मृत्यूनंतर आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसून पराक्रमाने ७ वर्ष औरंगजेबाबरोबर झुंज दिली. ताराबाई महाराणींचे  सेनापती धनाजी जाधव यांचेकडे बाळाजींनी चाकरी केली. ताराबार्इंना शह देण्यासाठी औरंगजेबाच्या मृत्युपश्चात मोगलांनी शाहू महाराजांना १७०७ ला  कैदेतून सुटका केली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये स्वराज्याच्या राजगादीसाठी संघर्ष सुरु झाला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणून शाहू महाराजांना अनेक मातब्बर सरदारांचा पाठिंबा होता. ताराराणींचा पक्षाही मजबूत होता. शाहूमहाराज दिल्लीवरून साताºयास येण्यास निघाले. वाटेत खानदेशात ते आले. तेथे धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे, शंकराजी नारायण सचिव यांना शाहूमहाराजांनी पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. त्यासाठी बाळाजी भटांना बरोबर घेऊन जाधवराव शाहूमहाराजांनी भेटले. पुढे शाहूमहाराज साताºयास आले. बहिरोपंत पिंगळे हे त्यांचे पेशवे होते. त्यांच्याकडे लोहगड व राजमाची किल्ला होता.  मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे ताराबार्इंच्या पक्षातील. आंग्रेनी शाहू महाराजांच्या बहिरोपंत पेशव्यास तसेच निळो बल्लाळ या चिटणीसास राजमाची किल्यात कैद करून पुण्याजवळील असलेले लोहगड, राजमाची किल्ले ताब्यात घेतले होते.  त्यावेळी बाळाजी विश्वनाथ फौज घेऊन लोहगडाजवळ आले. आंग्रे ओळवण (सध्याचे वळवण) येथे त्यांना भेटले. कोकणातील असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रांचे जवळचे संबंध होते. अांग्रे यांनी समंजसपणा दाखवून वाद मिटविला. पिंगळे यांच्यावर शाहूमहाराज नाराज झाले होते.  त्यांना दूर करून पेशवाई दुसºयाला देण्याचा त्यांचा विचार झाला. खानदेशातून महाराज साताºयास येत असताना बाळाजी विश्वनाथ त्यांच्याबरोबर होते. त्यांच्यातील कर्तेपणा पारखून महाराजांनी २७ नोव्हेंबर १७१३ रोजी पेशवे पद बाळाजींना बहाल केले. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे महाराष्ट्रातील सर्व पराक्रमी सरदांना शाहूमहाराजांच्या बाजूने वळवून घेतले.  पुढे बाळाजींनी दिल्लीपर्यंत स्वारी केली व सासवड येथून आठ वर्षापर्यंत कारभार सांभाळला. बाळाजी पेशवे १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
श्रीशाहूनरपति हर्षनिधान ॥ बाळाजी विश्वनाथ मुख्यप्रधान ॥
अशी बाळाजींची मुद्रा होती.

‘पेशवे’पद

             पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद - ‘पेशवे’ पेशवे म्हणजे पंतप्रधान. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान होते. बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या दरबारात पेशवे पदावरून वाद वाढू लागले.  दरबारातील श्रीपतराव व अष्टप्रधानांनी हे पद (पेशवे) कोकणस्थांमध्ये न देण्याचा आग्रह धरला. पण शाहूमहाराजांनी स्वराज्याचा पेशवा म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांचा पुत्र विसाजी अर्थात बाजीराव यास पेशवे पद देण्याचे नक्की केले. बाजीरावांना पेशवे पद हे वंश परंपरेतून मिळाले नव्हते तर बाजीराव हा तरुण, युद्धनिपुण होता. तसेच बाळाजी विश्वनाथांबरोबर सतत राहिल्याने बाजीरावांना युद्धाचा तसेच राजकाराणाचा अनुभव प्राप्त झाला होता. म्हणून शाहू महाराजांना तोच पेशवे पदासाठी योग्य वाटला. १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरांवाना बहाल केली. बाजीराव त्यावेळी केवळ २० वर्षांचे होते.




  जन्म   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००     मृत्यू    :  इ.स. २८ एप्रिल १७४०

श्रीमंत बाजीराव पेशवे :

         बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.
             बाजीरावांना हरवणं त्याच्या काळातल्या शत्रूंनाही जमलं नाही.  मराठेशाहीला नर्मदेच्या पलिकडे मराठी घोडदळ नेणारा हा पहिलाच सेनापती. चारशे वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेतून जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच.  दिल्लीपर्यंत धडका मारून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. भीमथडीची तट्टे नर्मदेपार नेल्यामुळे उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत येण्याचे बंद झाले.  बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.
             बाजीरावांची देशभर मोठी दहशत होती. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.  पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रुढ झाला असावा.   बाजीरावाने शनिवारवाडा बांधला आणि साताºयाच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले.
॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥
अशी बाजीरावांची मुद्रा होती.

कुशल सेनापती

            बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाºयाप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.
             घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती. बाजीरावाने पायदळ आणि तोफखाना बाळगणेच सोडले होते. त्या काळाच्या लढाईचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सशक्त घोडदळ. बाजीराव घोड्यावर लहानाचा मोठा झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते.  बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाºया नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.

मस्तानी :

            बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मस्तानी.  पेशवे दप्तरातील पत्रांवरून तिचे नावे मस्तान कलावंत होते व बाजीरावांच्या (नानासाहेब) लग्नसमारंभात तिला नाचगाण्यासाठी आणण्यात आले होते. तर निजामाच्या नाटकशाळेतून बाजीरावाने तिला आणली अशीही एक आख्यायिका आहे. महंमदशहा बंगशपासून मुक्तता केल्याने छत्रसालेनेच तिला बाजीरावाला अर्पण केली असेही म्हणतात. खरे काय ते देवे जाणे. परंतु बाजीरावाने सहकारिणीचा दर्जा देऊ केल्यानंतरही अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागले. मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाड्यात आणणारा म्हणून ब्राह्मणांनी या पेशव्याला उपेक्षितच ठेवलं. काही ब्राह्मणांनी तसेच घरातील नातेवाईकांनी मस्तानी प्रकरणावरून  त्यांना आयुष्यभर छळले. हिंदुस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कुरघोड्यांना तोंड देऊ शकले नाही. पुण्यातल्या तत्कालीन ब्राह्मणांना तसेच खुद्द बाजीरावांच्या आईला व बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून  समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला.  अतुलनीय पराक्रम गाजवूनही बाजीराव उपेक्षित राहिल्यासारखाच वाटतो. मस्तानी त्यांचे प्रेम हे कदाचित त्याचे कारण असावे. बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेवर अनेक लहान मोठ्या तर काही अतिरंजक कादंबºया लिहिल्या गेला. नुकतीच टिव्हीवर 'श्रीमंत पेशवा... बाजीराव मस्तानी' मालिका पाहण्यात आली.  अनेक कथा, कादंबºयामधून रंगेल व शौकीन म्हणून बाजीरावांचे वर्णनही आले. लोकांना खरा इतिहास कधीच आवडत नाही. काहीतरी रंजक, मनोरंजनात्मक कहाणी तयार करून चुकीचा इतिहास गळी उतरविला की बरे वाटते. एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा आदर्श घेण्यापेक्षा त्यातील वाईट? गुण कसे उचलायचे ते आपण पाहता असतो. शेवटी चांगले काय आणि वाईट काय हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. असल्या रंजक कहाण्यांमधून  बाजीरावाच्या पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान होते. योद्धा बाजूला राहून एक प्रेमीवेडा पेशवा तेवढाच पुढे आपल्यापुढे मांडला जातो. मस्तानी हे बाजीरावांच्या आयुष्यातलं शृंगारिक पर्व जरी असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारकच ठरेल. शेवटी प्रत्येक व्यक्तीला स्वतचे असे खासगी आयुष्य असतेच म्हणून काही बाजीरावांनी केलेल्या पराक्रमाची माती होत नाही.  खरे तर मस्तानी-बाजीराव हे प्रेमाचे प्रतिकच. एका परजातीतील स्त्रीवर त्याकाळात प्रेम करून सहचारीणीचा मान देण्याचे धाडस ‘बाजीराव’च करू शकेल.

रावेरखेडी :

            २८ एप्रिल १७४० ला (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) मध्य प्रदेशातील नर्मदेकिनारी असलेल्या रावेरखेडी येथे ज्वर आल्याने बाजीरावांचे निधन झाले.  बाजीरावांना केवळ ४० वर्षांचे आयुष्य मिळाल. तिथे पुढे नर्मदातटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची समाधी बांधली. उत्तरेत जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडावी लागे.  हे मोठे सैनिकी ठिकाण होते. नर्मदेच्या तटाजवळ असलेली ही समाधी महेश्वर धरण प्रकल्पामुळे पाण्याखाली जाणार असल्याचे मध्यंतरी वाचण्यात आले. रावेरखेडी हे बुडित क्षेत्रात येत असून समाधीसह इतर अनेक भाग पाण्याखाली जाणार आहे.  महाराष्ट्रापासून एवढ्या लांब ठिकाणी त्याकाळात घोडेस्वारी करत बाजीराव कसे गेले असतील याचं आश्चर्य वाटते. घोडेस्वारीचं त्याचं कौशल्य अफाट असावं.
आपल्या घरातील व जातीपंथातील लोकांशी मानसिक युद्ध खेळून हरलेला? तरीही जिंकलेला हा ‘राऊ’ रावेरखेडीस चिरविश्रांती घेत खरा यौद्धाच ठरला. बाजीराव पेशव्यांचा हा इतिहास दैदिप्यमान आणि गौरवशाली आहे. हा इतिहास आपण दुर्लक्षित केला नाही तर चिरंतन टिकणारा आहे.


अनेक लोकांचा बाजीराव पेशवे व त्यांच्या परिवारातील विविध व्यक्तींविषयी नावावरून संभ्रम होतो. कोणाचा मुलगा कोण? काका कोण? हेच कळत नाही. पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, बाळाजी ऊर्फ नानासाहेब पेशवे अंताजी ऊर्फ चिमाजी अप्पा, रघुनाथ ऊर्फ राघोबादादा. भाऊसाहेब अशा विविध नावांमुळे पेशवे इतिहास सर्वसामान्य माणासाला समाजायला अवघड जातो.  पूर्वी आजोबांचे नाव मुलाला देण्याची पद्धत असल्याने हा नावातील संभ्राम तयार झाला. यासाठी मी सर्वसामान्य वाचकाला समजेल अशी पेशव्यांची वंशावळी  तयार केली आहे ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (पेशवे वंशावळी)  पेशव्यांच्या वंशावळेत दत्तक व औरस व अनौरस मुले, तसेच बहीणी यामुळे ही यादी अजून वाढेल त्यामुळे नाहक महत्त्वाच्या व्यक्ती संबंधी माहिती अपूर्ण राहील. यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींचाच यादीत समावेश केलेला आहे.  वेळ मिळाल्यास सदर व्यक्तींचे फोटोसहित देण्याचा मी प्रयत्न करेन.


काही ठळक घटना :

  • २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू
  • १८ आगस्ट  १७०० - बाजीरावांचा जन्म.
  • १७०७ - कैदेतून शाहूमहाराजांची सुटका.
  • बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
  • बाळाजी विश्वनाथ - १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
  • १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली
  • १७२८ निजामाविरुद्ध पालखेडची लढाई
  • २८ एप्रिल १७४० ला रावेरखेड येथे मृत्यू
  • १७ डिसेंबर १७४० चिमाजी आप्पा एदलाबाद येथे मरण पावला.

मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान)

  • सोनोपंत डबीर     १६४०-१६५२
  • श्यामपंत कुलकर्णी रांझेकर     १६५२-१६५७
  • मोरोपंत पिंगळे     १६५७-१६७४
  • राज्याभिषेकोत्तर (१७१२-१८१८)
  • मोरोपंत पिंगळे     १६७४-१६८३
  • मोरेश्वर पिंगळे     १६८३-१६८९
  • रामचंद्रपंत अमात्य     १६८९-१७०८
  • बहिरोजी पिंगळे     १७०८-१७११
  • परशुराम त्रिंबक कुलकर्णी
  • (पंतप्रतिनिधी)     १७११-१७१३
  • साम्राज्याचे शासक १७१२-१८१८
  • बाळाजी विश्वनाथ भट    १७१२-१७१९
  • बाजीराव पेशवे     १७२०-१७४०
  • बाळाजी बाजीराव  ऊर्फ नानासाहेब १७४०-१७६१
  • माधवराव पेशवे     १७६१-१७७२
  • नारायणराव     १७७२-१७७३
  • रघुनाथराव पेशवे     १७७३-१७७४
  • सवाई माधवराव पेशवे     १७७४-१७९५
  • दुसरा बाजीराव     १७९५-१८५१
  • नानासाहेब     १८५१-१८५७
  • पेशवाईचा अस्त.

शिवाजीमहाराजांचे अष्टप्रधान मंडळ

१) प्रधान  २) आमात्य  ३) सचिव   ४) मंत्री
५) सुमंत    ६) न्यायाधिश ७) दिव्यशास्त्री  ८) सेनापती













संदर्भ :
१) ऐतिहासिक गोष्टी व उपयुक्त माहिती (भाग १) - लोकहितवादी
२) दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, यादी वगैरे - पुरुषोत्तम विश्राम मौजे, डी. बी. पारसनीस
३) पेशव्यांची बखर : भीमराव कुलकर्णी
४) भारताचा इतिहास : डॉ. श. गो. कोलारकर


मराठेशाहीचा अंत कधी झाला याबाबत अनेक इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. याची कारणे अनेक आहेत.
  1. मराठी लष्कराचे आधारस्तंभ असलेले महादजी शिंदे यांचे १२ फेब्रुवारी १७९४ ला मृत्यू झाला. त्यामुळे जुने जाणते महादजी गेल्याने अनेक इतिहासकार मराठेशाहीचा अंत झाला असे मानू लागले.
  2. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक नाना फडणवीस १३ मार्च १८०० ला मृत्यू पावले.  नानांचा मृत्यू म्हणजे मराठेशाहीला पडलेले मोठे भगदाड होते. इंग्रजांनी तर पेशवाईचे शहाणपण गेल्याचे लिहून ठेवलेले आहे.
  3. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी शनिवारवाड्यावर इंग्रजांनी युनियन जॅक पडकाविला. या घटनेनेसुद्धा मराठेशाही लोप पावली असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.
  4. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव अशीरगडाजवळ जनरल माल्कमच्या स्वाधीन झाला. व बाजीरावांनी राज्यावर पाणी सोडले. ही मुख्य घटना अनेक इतिहासकार मराठेशाहीचा अंत झाल्याचे सांगतात.
  5. काही इतिहासकार १६ मे १८४९ ला सातारा गादी संपल्याचे नमूद करतात.
खºया अर्थाने १८१८ ला पेशवाई संपल्याने हे वर्ष मराठेशाहीचा अंत झाल्याचे अनेकांनी नमूद करून ठेवले आहे. 



बाजीरावांचा पराक्रम अजूनही आपल्या महाराष्ट्रात फारसा माहिती नाही. बाजीरावांनी दिल्लीपर्यंत भगवा फडकावून मराठ्यांचा दरारा निर्माण केलेला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा या लेखानंतर अनेकांनी माहिती दिल्याबद्दल आभार मानले. पालखेडच्या युद्धासंदर्भात श्री. पित्रे यांची लोकमतमधील मंथन पुरवणीमधील मालिका अधिक माहितीसाठी देत आहे.
बाजीरावांचा पराक्रम सगळ्यांना अधिक माहिती व्हावा हाच हेतू आहे. खालील दोन्ही लेख लोकमत पुणे आवृत्तीच्या मंथन या पुरवणीत अनुक्रमे दि. ३० जून २०१३ व ७ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झाले आहेत. लेखक श्री. शशिकांत पित्रे भारतीय लष्करातील मेजर जनरल पद भूषवलेले नामवंत अधिकारी व युद्धशास्त्राचे अभ्यासक आहेत़ पूर्व परवानगीशिवाय हे लेख येथे जोडत आहे. त्याबद्दल क्षमस्व. लोकमत व श्री. शशिकांत पित्रे यांचे लेखाबद्दल धन्यवाद.

http://ferfatka.blogspot.com/2013/10/blog-post_17.html
खालील लिंकवर क्लिक अथवा ब्राऊजरमध्ये कॉपी पेस्ट करून फाईल डाऊनलोड करून वाचता येतील.
https://docs.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFUGdHUnhfdXNPdVU/edit?usp=sha...
https://docs.google.com/file/d/0ByNGX3NhYDvFY0ZxZ2lILWE1TEE/edit?usp=sha...

Oct 10, 2013

कॉपी करू नका