Friday, March 14, 2014

चित्रबलाकावर ‘अवकळा’

दोन आठवड्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या सासुरवाडीला जाण्यासाठी निघालो. पुणे - सोलापूर महामार्गाने प्रथम सिद्धटेकच्या गणपतीचे दर्शन घेऊन पुढे राशिनमार्गे भिगवणला गेलो. वाटेत चिंचेच्या झाडावर घरटी केलेल्या या चित्रबलाक पक्षांनी आमचे स्वागत केले.  मागील आठवड्यात या उजनी धरणाच्या परिसरात प्रचंड गारपिट झाली. रोहित पक्षी (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) यांचे सारंगागार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदापूर, भिगवण व उजनी परिसरातील या क्षेत्राला अवकाळी गारांच्या पावसाचा तडाखा बसला.  वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यां वाचून मन्न खिन्न झाले. ऐन विणीच्या हंगामात गारांचा पाऊस झाल्याने पक्षांचा हंगाम वाया गेला आहे. सुमारे ५०० अंडी व ६०० च्या जवळपास पक्षी मृत्युमुखी पडले वाचून मन दु:खी झाले. इंदापूराहून या पक्षांना पाहून येऊन मला जेमतेम काहीच दिवस झाले होते. त्या विषयी....

        


  गजानानचे दर्शन घेऊन राशिन मार्गे भिगवणला जाण्यासाठी निघालो. रस्ता चांगला असल्याने पाऊण तासात डिकसळला पोहचलो. वाटेत चिंचेच्या झाडावर चित्रबलाक पक्षांची घरटी पाहिली. साधारणपणे २ ते अडीच फुट उंच असलेला हा पक्षी मुलाने प्रथम एवढ्या जवळून पाहिल्याने आनंदाने उड्याच मारल्या.  दुसºया दिवशी सकाळी इंदापूरातील तहसील कार्यालयाच्या जागेत असलेल्या चिंचेच्या झाडांवरील चित्रबलाकाची घरटी पाहण्यासाठीही गेलो. शेजारी लोकवस्ती असून देखील चित्रबलाक पक्षी दर वर्षी आपले घरटी करतात. झाडाखाली पिल्लांसाठी आणलेल्या माशांचा सडा पडलेला दिसला. एवढ्या लांबून कोणत्याही नकाशाशिवाय हे पक्षी दरवर्षी कसे येतात? याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.  रोहित पक्षी मात्र धरणक्षेत्राच्या आतील बाजूस असल्याने मला पाहता आले नाही.

चित्रबलाक पक्ष्याविषयी :
पिवळ्या रंगाची मोठी आणि लांब चोच, चेहरा पिवळ्या रंगाचा त्यामुळे हा पक्षी मोठा मजेशीर व चेहºयाने गरीब दिसतो.   उर्वरित अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा नर व मादी दिसायला सारखेच असतात. पिल्लांसाठी आणलेला खाऊ देत असताना त्यांचा होणारा आवाज मजेशीर होता.







दोष निसर्गाचा का मानवाचा?
अवकाळी पावसाने महाराष्ट्रभर झालेला निसर्गाचा कोप व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे ओतोनात नुकसान झाले. हे नुकसान कदाचित भरूनही निघेल. मायबाप सरकार किरकोळ रकमा व दिलासा देऊन शेतकऱ्यांना तारेल देखील. विणीचा हंगामासाठी आलेल्या या पक्ष्यांची अंडी व नवजात पिले अवकाळी गारांच्या माºयाने मृत्यूमुखी पडली. उजनी जलाशयाला लागून असलेल्या भादलवाडी तलावावर या परिसरात चित्रबलाकांसह,  ग्रे हेरॉन, करकोचा, फ्लेमिंगो (रोहित पक्षी) या शिवाय अन्य पक्षांची ये-जा सुरू असते.  उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील मासे, बेडूक, साप, इतर कीटकांवर हे पक्षी गुजराण करतात.  दर वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयात चित्रबलाक इंदापूरला येतात. उजनी धरणाच्या परिसरात त्यांची अनेक घरटी दिसून येतात. गवत, काड्या वगैरे वापरून ते मोठे घरटी बनवितात. चिंचेच्या झाडावर साधारणपणे पंचवीस ते तीस घरटी पाहून जणू ही त्यांची मोठी कॉलनीच आहे आहे असे वाटले. सोबतीला वटवाघूळ देखील स्वत:ला उलटे टांगून या पक्षांचा दिनक्रम पाहत बसलेली दिसली. कच्छच्या रणातून दर वर्षी विणीच्या हंगामासाठी येणाऱ्या या सैबेरियन चित्रबलाक पक्षांना मानवनिर्मित प्रदूषणाचा चांगला फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढ, निसर्गातील हवामानाचे होणारे बदल, धरणातील जलप्रदूषणामुळे आवडते खाद्य नष्ट होऊ लागले आहे. सिमेंटची वाढत असलेली जंगले व मानवाची निर्सगामधील लुडबुडू या पक्ष्यांच्या अस्तित्वावर उठली आहेत.       



वर्तमानपत्रात आलेल्या अवकाळी पावसाच्या बातम्या व त्या विषयी विश्लेषण पाहून हे सर्व मानवनिर्मित उद्योग असल्याचे कळाले.  इंदापूरला गेल्या ५० वर्षांपासून राहणाºया माझ्या सासºयांनी देखील अशा प्रकारचा पाऊस व तो देखील गारपीटाचा पहिल्यांदाच पाहिला. मी जे चिंचेचे झाड पाहून आलो होतो त्या झाडांवरील बहुतांश पक्षी मेल्याचे त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले. पुढील वर्षी हे पाहुणे दुसऱ्या ठिकाणी आपले नवे ठिकाण शोधायला नक्कीच जातील त्यामुळे हे पाहुणे परत पुढील वर्षी इंदापूरला येतील का नाही? याची शंकाच वाटते. 


1 comment:

bankapure said...

वाह … मस्त माहिती … जायलाच पाहिजे एकदा इंदापूर भागात …

कॉपी करू नका