Sunday, April 14, 2013

थेरगाव बोट क्‍लब

थेरगाव बोट क्‍लब  

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे  उभारण्यात आलेल्या काही पर्यटक प्रकल्पांमधील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून थेरगाव येथील बोट क्लब नावारुपाला येऊ लागला आहे. सुमारे 5 एकरावर पसरलेल्या या बागे शेजारी  वाहणा:या पवना नदीत पर्यटकांना बोटिंगचाही मनसोक्त अनुभव घेता येऊ लागला आहे. त्या विषयी...

थेरगाव :
      थेरगाव हे पवना नदीकाठी असलेले एक छोटेसे गाव. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेशानंतरचे हळूहळू विकसित होऊ लागले. बापुजीबुवा हे थेरगावचे ग्रामदैवत. पूर्वी थेरगावचे गावठाण पवनानदीकाठी केजुबाई मंदिर परिसरात होते. कालांतराने बापुजीबुवा मंदिर विभागात गावचे स्थलांतर झाले. येथील पदमजी पेपर मिल या कारखान्यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळाला.
      गावाच्या इतिहासाविषयी एक कथाही सांगितली जाते. फार पूर्वी शेतीला पाणी सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी थेरगावचे गावठाण नदीकाठी होते. येथील केजुबाई मंदिराजवळ सुसरींचे प्रमाण वाढले. पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांवरही सुसरींचे हल्ले वाढले. यामुळे सोळाव्या शतकानंतर गावठाणाचे स्थलांतर बापूजीबुवा मंदिर परिसरात झाले.  प्रत्येक वर्षी चैत्रपौर्णिमेस गावामध्ये बापुजीबुवा देवाचा उत्सव भरतो.  थेरगाव परिसर पिंपरी व चिंचवडला जवळ असल्याने अनेकांनी येथे गृहउद्योग उभारले आहे. वाहतूकदृष्टीने पुण्याकडे जाण्यास थेरगाव जवळ आहे.
        बच्चे कंपनीला शाळांच्या सुट्टय़ा लागल्या आणि परिसरासतील बागा फुलू लागल्या. संध्याकाळी कुठल्याही बागेत जाण्यापेक्षा घरापासून तीन ते चार किलोमीटरवर असणा:या थेरगाव येथील बागेत जाण्यास निघालो. उन्हाळय़ात अंगाची लाहीलाही करून सोडणारे उन. उन्हामुळे बाहेर तर जाता येत नाही. मग अंगावर पाण्याचे थंडगार तुषारे घेण्यसाठी मस्त ठिकाण म्हणजे थेरगाव येथील हा बोटक्लब.
       श्री मोरया गोसावी मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणा:या या क्लबची उभारणी १६ फेब्रुवारी 2007 साली महापालिकेतर्फे  करण्यात आली. थेरगावला शेती प्रमुख व्यवसाय. औद्योगिकीकरणानंतर येथील राहणीमानात फरक जाणवू लागला. मोठमोठे प्रकल्प, औद्योगिक वसाहतीमुळे थेरगाव रुप पालटू लागले. पवना नदी शेजारील सुमारे 5 एकर जागेवर महापालिकेने सुंदर बाग निर्माण केली आहे. या बागेचे वैशिष्ट म्हणजे येथून वाहणारा कृत्रिम धबधबा. सुमारे 400 ते 500 मीटर लांब असा येथे कृत्रिम धबधबा करण्यात आला आहे. पाणी स्वच्छ असल्याने बच्चे कंपनीला येथे मनसोक्त पाण्यात खेळायला मिळते.



लहान मुलांसाठी खेळणी
       येथे झोकाळे, घसरगुंडी, खांबावरील विविध खेळ लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. मात्र, काही हौशी पर्यटक लहान मुलांच्या झोकळय़ांवरती झोकळा घेऊन आपली इच्छा पूर्ण करताना दिसतात. मात्र, यामुळे नाहक खेळण्याची मोडतोड नक्कीच होणार आहे. या ठिकाणी पर्यटकांबरोबरच प्रेमी युगलांचाही वावर वाढल्याचे दिसते. झाडामागे, ओडाश्याला जाऊन प्रेमाचे चाळे करणारे प्रेमवीर ही आपणास पाहावयास मिळतात. असो.


टॉयट्रेन :
       लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन ठरू लागली आहे. ट्रेन खाली बहुधा रिक्षाचे एंजिन जोडून रेल्वेसारखा गाडीला आकार दिला आहे. तरीही लहान मुलांना अर्थातच त्यांच्या पालकांनाही या ट्रेनमध्ये बसण्याचा मोह आवारता येत नाही. फक्त 5 रुपये तिकीट दर असल्याने येणारा प्रत्येकजण याचा अनुभव घेतोच. उद्यानातील प्रवेशद्वारापासून बागेच्या शेवटर्पयत एक फेरफटका मारता येतो.
लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन


कृत्रिम धबधबा


बोटक्लब :
       उद्यानाचे मुख्य आकर्षण ठरलेले हा बोट क्लब पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागला आहे. केजुदेवी बंधारा बांधल्याने पवना नदीत पाणी अडवून ठेवता येते. याच अडविलेल्या पाण्यावर येथे बोट क्लब सुरू केला आहे. हौशी पर्यटक येथे बोटिंगचा अनुभव घेतात. माणसी 30 रुपये पॅडल बोट 15 मिनिटांसाठी तर मोटार बोट 40 रुपये 15 मिनिटांसाठी आहेत. इतर बोटिंग क्लब पेक्षा या ठिकाणी दर कमी आकारणी आहे. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक बोटिंग करतात.
बोट क्लब

बोट क्लब

बोट क्लब



केजुदेवी मंदिर :
       बोटक्लबच्या अलीकडेच वाहनतळाच्या ठिकाणी नदीकाठी आपल्याला एक मंदिर दिसते. हे केजुदेवीचे मंदिर. नवरात्रत या ठिकाणी मोठा उत्सव भरलेला दिसतो. पावसाळय़ात अनेकवेळा हे मंदिर पाण्याखाली जाते. या बंधा:यावर आजुबाजूच्या परिसरातील पोहणारे तरुण नदीत डुंबायला व पोहायला येतात. अनोळखी ठिकाण असल्याने या बंधा:यावर नवख्या माणसाने पोहण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा या बंधा:यावर दुर्घटना घडल्याच्या बातम्या वाचण्यात आलेल्या आहेत.
केजुदेवी

केजुदेवीचे मंदिर व पवना नदी.


वेळ व दर आकारणी :
  • उद्यानात प्रवेश घेण्यासाठी लहान मुलांना 5 रुपये तर 12 वर्षापुढील व्यक्तीसाठी 10 रुपये प्रवेश फी आकारली जाते. 
  • उद्यानाची वेळ : सकाळी 11 ते सायं. 7

  • कसे जाल :
  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवडगावात जाणा:या रस्त्याने थेट चापेकरचौकात जाऊन तेथून मोरया गोसावी मंदिरात गजानानचे दर्शन घेऊन धनेश्वरच्या महादेवाचे दर्शन घ्यावे तेथील जवळच्या पुलावरून सरळच आपल्याला थेरगाव बोटक्लबकडे जाता येते.
  • दुसरा मार्ग : पुण्यातून डांगे चौकातून येऊन उजवीकडे वळून चिंचवडगावाकडे जाणा:या रस्त्यावर डावीकडे बोटक्लबला जाता येते.
  • तिसरा मार्ग : चापेकर चौकातील नव्याने उभारलेल्या पुलावरून डांगे चौकाच्या अलिकडे डावीकडे बिर्ला हॉस्पिटलशेजारील रस्त्यावरून बोटक्लबकडे जाणारा रस्ता आहे.
  • पुणे ते चिंचवडगाव अंदाजे 18 किमी.
  • चिंचवड ते बोटक्लब : अंदाजे 3 किमी.

अजून काय पहाल

एकंदरीत एक दिवस वेगळय़ा ठिकाणी व निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आल्याने मन तरतरीत हे नक्की.
सकाळी लवकर घरून निघाल्यास पिंपरी-चिंचवड परिसरातील अन्य पर्यटन स्थळे ही पाहता येणे शक्य आहे.

Sunday, April 7, 2013

वाघोलीचा वाघेश्वर

वाघोलीचा वाघेश्वर 


         तुळापूर येथून निघून 20 मिनटात वाघोलीला असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो. पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून 20 कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे  पुरातन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे. तसेच  पेशवाईतील शूर कर्तबगार सरदार पिलाजीराव जाधवरावांची समाधी आहे.
          वाघेश्वर मंदिराची रचना ही चौकोनी गाभारा, सभा मंडप, भिंतीवरील अनेक कोनाडे, शिखराची रचना टप्प्याटप्प्याची खालच्या टप्प्यापेक्षा वरचा टप्पा लहान होत जाणारा. त्यामुळे मंदिराकडे पाहिल्यास आपली नजर सरळ  वर न जाता ती आडव्या रेषामध्ये जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरील नंदी मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. नंदी पांढ:या रंगात रंगवलेला आहे. मंदिराच्या बाहेरील प्रत्येक स्तंभाची रचना कलशावर कलश मांडून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या बाहेरील खांबावर दगडी शिल्पामध्ये राम अवतार, बळीवामन, शेषशाही विष्णू, नृसिंह अवतार, वराहअवतार, गरुड देवता, हनुमान, मत्स्य अवतार, कच्छ अवतार,यक्ष, व्याल, महिशाशूरमदिर्नी, मल्ल, व्याल,कल्की अवतार, गणोशमूर्ती, नागदेवता, सहस्त्न भाऊ आणि परशुराम युद्ध ,अश्वमेध यज्ञ, घोडा अशा शिल्पकृती दगडावर कोरलेल्या आहेत.  मंदिराजवळ असणारा  तलाव  पर्यटकांचे आकर्षण ठरू लागला आहे ते येथील बोटिंगमुळे. संध्याकाळचे 7.30 वाजल्यामुळे मला फोटो काढता आले नाही.










पिलाजी जाधवराव :
पिलाजीरावांनी तलावाच्या शेजारील  वाघेश्वर  मंदिराजवळ बागेसाठी पेशव्यांकडे जागेची मागणी केली होती. गावातील लोकांना पाण्याची अडचण दूर होण्यासाठी तलाव बांधला. ही मागणी बाजीराव पेशव्यांनी 1722  मध्ये मान्य करून पिलाजी आणि संभाजी जाधव रावास जमिन दिली.   पिलाजीरावांनी  दिवेघाटात तलाव बांधला. तो मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिवेघाटात वर पोहचल्यावर खाली नजर टाकल्यास मोठा पाण्याचा कोरडा तलाव दिसतो हाच तो मस्तानी तलाव. मध्यंतरी पेपरात तलाव साफ करण्याच्या बातम्या झळकल्या होत्या. 1729 च्या पूर्वी या तलावाची बांधणी  पिलाजीरावांनी केली. पुढे बाजीरावांकडे हा तलाव आला.

सरदार पिलाजीराव जाधवांची समाधी
मंदिराशेजारी पाषाणातील सुबक बांधकाम असलेली पिलाजीरावांची समाधी आहेत. या समाधीजवळच जाधवराव घराण्यातील अनेक पुरु षांच्या समाध्या दिसतात.

तुळापुर

तुळापूर   



रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे असे ठरवून जवळ असल्या तुळापूरला जायचे ठरले. अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजीमहाराज व त्यांचे सुपूत्र धर्मवीर संभाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तुळापूर येथील भूमी पुण्यापासून काहीच अंतरावर आहे. त्या विषयी...

तुळापूर : 
आदिलशाही दरबारातील वजिर मुरारपंत जगदेव यांनी ठिकाणी हत्तीला तराफ्यात उतरवून त्याचे वजनाइतके सोने दान केले अशी एक गोष्ट सांगण्यात येते. यावरूनच गावाला तुळापूर नाव पडले. तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. पूर्वीचे नाव 'नांगरवास' असे होते. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेले छोटेसे गाव. तुळापुर आळंदी पासून अंदाजे १४ किलोमीटरवर  तर पुण्यापासून ३० किलोमीटरवर आहे.  येथे महाराष्ट्रातील नद्यांचा दुर्मिळ त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. श्रीक्षेत्र आळंदीकडून वाहत येणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलात उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा  या तीन मोठ्या नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

संगमेश्वर मंदिर

तुळापूरला श्री शंकराचे जुने  मंदिर होते. काही कालावधीनंतर हे मंदिर श्री संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. इसवी सन १६३३ च्या सुमारास आदिलशाही दरबारातील वजिर श्री मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रुद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेचे पालन करून श्री संगमेश्वर मंदिराची डागडुजी केली. येथे वास्तव्यास असताना छत्रपती शहाजी महाराज तसेच बालशिवाजी दोघेही संगमेश्वराची पूजा करीत असत. येथील संगमावर मोठा नदीघाट उभारला असून, बोटिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. माणसी ३० रुपये प्रमाणे आपल्याला नदीतून एक चक्कर मारता येते.  निरगुडकर फाउंडेशनद्वारा येथे संभाजीमहाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. 
तमाम शिवप्रेमींची ही श्रद्धास्थाने. तुळापूरपासून जवळच असलेले वढू बुद्रुक आणि तुळापूर ही भीमा नदीतीरावरची ही पवित्र स्थाने. या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने अमानुष व क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले. त्या सर्व इतिहासाची साक्षीदार ही भूमी आहे.  शंभूराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने साखळदंडात कैद करून तुळापूर येथे आणले होते.  फाल्गुन अमावस्येला ११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती.  वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. वढूपासून तुळापूर ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. वेळेअभावी मला वढूला जाता आले नाही.  औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. आपला राजाचा क्रुरतेने केलेला अंत येथील जनतेला कळल्यावर अंतिम संस्कार योग्य रीतीने व्हायला पाहिजे असे वाटले. वढूच्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमानदी रात्रीत ओलांडून व मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिमसंस्कार केले. 

संभाजी राजे : 
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ (14 मे 1657चा.) रोजी पुरंदर गडावर झाला. राजे केवळ २ वर्षांचे असतानाच सईबाई वारल्या. सईबार्इंच्या मागे राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीत त्यांना राजकारणाचे धडे शिकू लागले.  या काळात महाराजांच्या बरोबर त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडला. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या गोष्टीत संभाजी राजे पारंगत होते. राजांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथात  केवळ ९ वर्षांच्या कालखंडात राजांनी १२८ लढाया जिंकून शिवाजीमहाराजांचे नाव राखले. 
                   संभाजीराजांचा वाढता पराक्रम औरंगजेबाला घाबरून सोडणारा होता. पूर्ण ताकदीनिशी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. 1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वर येथे मुक्कामी थांबले होते.  1 फेब्रुवारी 1689 ला आपला सख्खा मेहुणा गणोजी शिर्केयाच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले.  तेथून धिंड काढत अतिशय क्रूरपणो  15 फेब्रुवारी 1689 या दिवशी पेडगावच्या किल्यात औरंगजेबासमोर राजांना आणण्यात आले. धर्म बदलण्याची अट लाथाडून धर्मनिष्ठ राजांनी मरण पत्करले. 12 मार्च 1689 या दिवशी गुढीपाडवा होता.  गुढीपाडवा हा हिंदुचा मोठा सण. या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली.   राजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. मृत्युसमयी राजांचे वय अवघे 32 होते.

महाराजांच्या पराक्रमाने, शौर्याने ही भूमि पावन झालेली आहे.  संभाजीराजांबद्दल वाचून व ऐकून अंगावर आजही काटा उभा राहतो. अशा ह्या परमप्रतापी धर्मविर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळास एकदा तरी प्रत्येकाने भेट अवश्य द्यायला हवी. 
तुळापूरहूनजवळच असलेल्या वाघोलीकडे जाण्याकडे निघालो. वाघोली हे पुणे-नगर रस्त्यावरील प्राचीन गाव. येथे वाघेश्वराचे जुने मंदिर आहे. तुळापूरहून निघाताना संध्याकाळचे ६.३० वाजले होते. 

वाघाच्या जबड्यात घालुनि हात मोजुनि दात...
बलिदान स्थळाकडे जाणाºया मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर हे शिल्प बसविले आहे. छत्रपती संभाजीमहाराज यांचे मनाला स्फूर्ती देईल असे शिल्प आहे. रायगडच्या पायथ्याला सांदोशीच्या जंगलात संभाजीमहाराजांनी सिंहाशी झुंज दिली होती. त्याचा जबडा हाताने फाडून ठार केले होते. या घटनेवर आधारित हे शिल्प असून, सुमारे आठ फूट उंच, दहा फूट लांब असे शिल्प आहे.
 तुळापूर येथे स्वागत कमानीवर साकारलेले आकर्षक शिल्प.
श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांचे प्रेरणादायी शिल्प.

कवि कलश यांची समाधी.
श्री कवी कलश यांची समाधी : 
श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तसेच संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व  काव्यसम्राट श्री कवी कलश यांना देखील संभाजी महाराजांबरोबरच तुळापूर येथे ठार करण्यात आले. त्यांची समाधी आपणांस संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजुस दिसते.
श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज समाधी.

संगमेश्वर येथील मंदिर व कळस.

मंदिरासमोर असलेला छोटा नंदी.


श्री संगमेश्वर
श्री संगमेश्वराचा कळस.



भीमा, भामा व इंद्रायणनदीचा त्रिवेणी संगमावरील मनोहारी दृश्य.
नदीपात्रत करण्यात येणारे नौकाविहार.


नदीतिरावरील श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर



नदीचा घाट


कसे पोचाल :
  • पुण्यापासून ईशान्येला अंदाजे ४० किलोमीटरवर असलेल्या तुळापूर या ठिकाणी पोहचण्यासाठी नगररोड मार्गे सुमारे ३२ किलोमीटर अंतर तर आळंदी रोड मार्गे अंदाजे ३४ किलोमीटर अंतर पार करावे लागते. 
  • तुळापूर येथे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध आहे.
पुण्याकडून यायचे झाल्यास :
  • पुणे नगर रोड - चंदन नगर  - वाघोली -  लोणीकंद - (डावीकडे) तुळापूर फाटा -फुलगाव - तुळापूर.
दुसरा मार्ग
  • पुणे -आळंदी रोड मार्गे:  पुणे - येरवडा - विश्रांतवाडी - कळस - दिघी - च-होली -आळंदी - मरकळ - तुळापूर (रस्ता थोड्या ठिकाणी खराब आहे.)
  • स्वत:ची गाडी असेल तर तुळापूरमध्ये पोहोचण्यासाठी जवळपास १ तास  पुरेसा होतो.


भीमा नदी  :
आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे उगम पावते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यामधुन व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या भागातून जातो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमांवरुन जाताना काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे व सोलापूर या जिल्हयांमधील हद्दीवरून ती पुढे जाते. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमांवरुन वाहत जाऊन ती पुढे नीरा नदीला घेऊन सोलापूर जिल्ह्यात जाते. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या आहेत. 

इंद्रायणी नदी : 
इंद्रायणी ही भीमेची उपनदी पुणे जिल्ह्याच्या मध्ये भागातून वाहते. ही नदी लोणावळयाच्या नैऋत्येला कुरवंडेजवळ उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर येथे ही भीमेस मिळते.

तुळापूर येथून निघून 20 मिनिटावर असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो.
वाघेश्वर

कॉपी करू नका