Sunday, November 10, 2013

शिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर


 

बºयाच वेळा मुंबईला जाणे झाले. रेल्वेने जाताना अंबरनाथ नावाचे स्टेशन लागते. या ठिकाणी शंकराचे प्राचीन मंदिर आहे. काहीनिमित्त कल्याणला नातेवाईकाकडे गेलो होतो. येताना जवळच असलेले अंबरनाथचे सुप्रसिद्ध मंदिर त्या विषयी.....



मध्य रेल्वेच्या मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील अंबरनाथ हे रेल्वेस्टेशन म्हणून ओळखलं जातं. या व्यतिरिक्त ‘‘.......... येथे काडेपेट्यांचा कारखाना आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करण्याचे कारखाने आहेत.’’ असे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नाचे उत्तर लहानपणी ....अंबरनाथ.... असे प्रत्येकालाच आठवत असेल.  औद्योगिकीकरणात झपाट्याने बदलत्या या शहराला प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे ते येथील प्रख्यात अंबरनाथ शिवमंदिरामुळे.


              संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने  जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ हे एक प्राचीन मंदिर. युनेस्कोने १९९९ साली या मंदिराला दर्जा दिला. हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार छित्तराज (इ.स. १०२०-१०३५) याने बांधण्यास प्रारंभ केला व त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी बांधकाम पूर्ण झाले. मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली.  शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली. अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर केवळ पाहण्यासारखे आहे. मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर म्हणतात. याच नावावरून गावाचे नावे अंबरनाथ  पडले असावे.







भूमिज पद्धतीचे बांधकाम :

महाराष्ट्रात शंकराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे गड किल्ल्यांवर उभारली गेली आहेत. तर काही जमिनीवरही बांधली गेली. औरंगाबादजवळील घृष्णेश्वर मंदिर, भीमाशंकर येथील मंदिर, पुण्याजवळील भुलेश्वर ही त्यापैकीच एक. अंबरनाथ मंदिराची निर्मिती ही एका विशिष्ट शैलीत केली गेली आहे. भूमिज पद्धतीत बांधलेले हे शिवमंदिर जुने मंदिर आहे. शिल्पशास्त्राप्रमाणे हे शिवमंदिर सप्तांग भूमीज पद्धतीत तयार केले आहे. मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. पूर्वी एकावर एक असे सात भूमी (शिल्परांगा) रचण्यात आल्या होत्या. मात्र गाभाºयावरील कळस नष्ट झाल्याने तीनच भूमी (शिल्परांगा) शिल्लक आहेत. सध्या मंदिराचा कळस अस्तित्वात नाही.

मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून त्याशिवाय आणखीन दोन प्रवेशद्वारे मंदिराला आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये असे बांधकाम पाहण्यास मिळते. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराची आठवण या ठिकाणी नक्कीच येते. हे मंदिर उभारताना गणिताचा विशेषत: भूमितीचा वास्तुशास्त्रात विचार केला गेल्याचे सहज लक्षात येते. केवळ दर्शनासाठी न जाता येथील स्थापत्यशास्त्राचा थोडा अभ्यास केल्यास हे सहज लक्षात येते.




देवदेवतांच्या शिल्पांचे मंदिर :

 मंदिराबाहेरील शिल्पे अनेक हिंदु देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरुडासन विष्णू, शिव, विवाहापूवीर्ची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरा वध मूर्ती, पार्वती चामुंडा, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, नटराज, कालीमाता, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती, महिषासुर र्मदिनी या मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहे. विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे, आभूषणे आणि वेशभूषाही साकारलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. हे बहुधा शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते. मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता एकाच मूर्तीत शिल्पकाराने साकारलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर शिल्पकारांनी साकारलेल्या अनेक भव्य मूर्ती पाहून क्षणभर त्या आपल्याकडे पाहत असल्याचा भासही होतो. गेली ९०० वर्षे या मूर्ती आपले मौन सांभाळून आहेत. पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पे असी शिल्पकृती येथे आपणास पहावयास मिळते. मंदिराच्या बाहेर व आतमध्ये देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर सुंदर वाटते.





महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमांडपंती शैलीची मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच 'भूमीज' स्थापत्य शैली असेही म्हणतात. सर्वच पुरातन मंदिरांना 'हेमांडपंती' शैलीची मंदिरे म्हणण्याच्या सवयच लोकांना लागून राहिलेली आहे. जुने मंदिर दिसले की हेमांडपंती मंदिर असल्याचे छातीठोकपणे लोकं सांगतात. देवगिरीच्या यादवांच्या काळातील वास्तुविशारद हेमाद्री पंडित अथवा हेमांडपंत यांनी मंदिर बांधण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली होती. त्या पद्धतीला हेमांडपंती शैली म्हणतात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. अंबरनाथचे हे मंदिर हेमांडपंती पद्धतीने बांधलेले असून कोकणात आढणाºया काळ्या दगडाला आकार देऊन ते कोरलेले आह़े

मंदिरासमोर प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत. मंदिरातील सभामंडपात चार खांब दिसून येतात. सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वतुर्ळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. सभामंडपापासून दहा बारा पायºया खाली उतरल्यावर गाभारा दिसतो. गाभाºयात स्वयंभू शिवलिंग आह़े   गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असून खाली उतरायला पायºया आहेत.
काळाच्या ओघात म्हणा किंवा परकीय आक्रमणांमुळे म्हणा मंदिराच्या अनेक मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. ऊन, वारा आणि पावसाने या मूर्ती झिजल्या आहेत. पण तरी सुद्धा ज्या मूर्ती वाचल्या आहेत ते शिल्पकलेचे अद्भूत दृश्य पाहून मन सुखावते. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही या मंदिराच्या वैभवाची साक्ष देत आहेत.  मंदिरात श्रावणात मोठी गर्दी असते. राज्यातील विविध भागांतून दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा येथे लागतात. येथील जत्रा तीन दिवस सुरू असते.
अजंठा वेरूळला जाणारे अनेक पर्यटक आहेत. मात्र, या प्राचीन मंदिराला भेट देऊन खरोखरच शिल्पकला प्राचीन काळी किती मोठी होती हे समजते.



प्रशासनाचे दुर्लक्ष :

सध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या खात्यातंर्गत आहे. उल्हासनगर  पालिकेच्या जवळच असलेल्या या मंदिराचा आजुबाजूचा परिसर अजूनही विकसित झालेला नाही.  वालधुनी  ऊर्फ वढवाण नदीच्या ओढ्याच्या काठावर हे मंदिर आहे. सध्या या ओढ्याची सांडपाणी वाहून नेणारा मोठा ओढा म्हणून ओळख सांगितली जाते.
वाढलेल्या प्रदूषणाचा फटका या मंदिराला बसू नये म्हणजे झालं. त्यामुळे हा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. सध्या मंदिराला चारही बाजूने संरक्षक जाळी उभारली गेल्याने बाहेरील भटकी जनावरे आदींपासून संरक्षण नक्कीच मिळाले आहे. मात्र, शेजारून वाहणारी मोठ्या आकारातील गटारे पाहून मन दु:खी होते. या गटारात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा, व अन्य कचरा तसाच पडलेला दिसून आला. कल्याणपासून अंबरनाथपर्यंतचा रस्ता अतिशय छोटा असल्याने वाहतूककोंडी रस्त्यावर जाणवली. वाटेत मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी कोणतेही मार्गदर्शक फलक दिसून आले नाही. तेव्हा वाटेत थांबून अनेकांना विचारून रस्ता शोधावा लागला.


कसे जावे :

  • मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना अंबरनाथ हे तिसरे स्थानक आहे. येथे हे मंदिर आहे. रेल्वे स्थानकापासून अंदाजे दोन किलोमीटरवर हे मंदिर आहे.
  • मुंबई दादर स्टेशनपासून अंदाजे ५२ किमी. वर आहे. रेल्वेने गेल्यास १ तासाचे अंतर आहे.
  • पिंपरी-चिंचवडमधून अंदाजे १३५ किलोमीटरवर अंबरनाथ आहे. कळंबोली व शिळफाट्यामार्गे जाता येते. येथील कळंबोली फाट्यावरून जाताना असंख्य गतिरोधक असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

No comments:

कॉपी करू नका